विधानसभेत जरांगे पुन्हा खेळ बिघडवणार? पाहा कुठे होऊ शकते भाजपला नुकसान

| Updated on: Oct 17, 2024 | 10:35 PM

विधानसभेत राजकीय एन्काऊंटर करणार असा इशारा जरांगे पाटील यांना भाजपला दिलाय. लोकसभेत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला. आता विधानसभेत महाराष्ट्रात 288 जागा आहेत. त्यामुळं पुन्हा जरांगेंनी खेळ बिघडवू शकतात.

विधानसभेत जरांगे पुन्हा खेळ बिघडवणार? पाहा कुठे होऊ शकते भाजपला नुकसान
Follow us on

निवडणुका लढायच्या का, याचा निर्णय 20 तारखेला जरांगे घेणार आहेत. त्याआधी अंतरवाली सराटीत जरांगेनी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरु केल्यात. याआधीही जरांगेंनी मुलाखती घेतल्या असून संभाव्य यादीही जरांगेंनी तयार केली. पण इच्छुकांच्या भेटीगाठीसह रात्रीच्या 2 भेटी खास आहेत..भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटलांची रात्री पावणे 2 वाजता भेट घेतली. 8 दिवसांतच विखे दुसऱ्यांदा जरांगेंच्या भेटीला आले. तर विखेंच्या भेटीनंतर रात्री पावणे 3 वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपेंनीही जरांगेंची भेट घेतली.

सुजय विखेंनी संगमनेरमधून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांविरोधात लढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र एका घरात एकच तिकीट या धोरणामुळं भाजपनं तिकीट नाकारल्याची माहिती असल्यानं सुजय विखे अपक्ष लढण्याची शक्यता आहे. त्यामुळं अपक्ष लढल्यास मराठा समाजाची मदत मिळेल का ?, याचाच अंदाज घेण्यासाठी विखेंनी जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीवरुन विचारलं असताना, आता सरकारच राहिलं त्यामुळं चर्चा करुन काय उपयोग ?, त्यांचा मालकच भरकटलाय म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी उमेदवार दिले होते…जरांगे फॅक्टरमुळं थेट नुकसान महायुतीचंच झालं. आणि महाविकास आघाडीला फायदा झाला. मराठवाड्यातील लोकसभेच्या 8 मतदारसंघापैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले आणि महायुती पराभूत झाली. आता पुन्हा एक तर पाडापाडी करणार किंवा उमेदवार देणार हे जरांगेंनी ठरवलंय. 20 तारखेला जरांगेंनी उमेदवार देण्याचं ठरवलं तर मतांचं विभाजनं मोठ्या प्रमाणात होणार हे निश्चित आहेत.

2019ची आकडेवारी पाहिली तj मराठवाड्यात भाजपचे 17 आमदार, शिवसेनेचे 12 आमदार निवडून आले होते. त्यापैकी शिंदेंकडे 9 आणि ठाकरेंकडे 3 आमदार आले..काँग्रेसचे 8 आमदार तर राष्ट्रवादीचेही 8 आमदार आले. त्यापैकी अजित पवारांकडे 6 आणि शरद पवारांकडे
2 आमदार आले आणि 3 इतर आहेत.

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात मराठा मतदार किती तेही समजून घेवूया.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 विधानसभा मतदारसंघ असून 28 लाख 11 हजार 75 एकूण मतदार असून 10 लाख 11 हजार मराठे मतदार आहेत’
  • जालन्यात 5 विधानसभेचे मतदारसंघ आहेत..एकूण 13 लाख 99 हजार 595 मतदारांपैकी 6 लाख 63 हजार 12 एवढी मराठा मतदारांची संख्या आहे.
  • बीड जिल्ह्यात 6 विधानसभा मतदार संघ आहेत. 21 लाख 97 हजार 830 एकूण मतदार आहेत, त्यापैकी 7 लाख 70 हजार मराठा मतदार आहेत.
  • नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत…त्यापैकी 27 लाख 69 हजार 157 मराठा मतदारांची संख्या आहे. त्यात मराठा मतदार आहेत, 6 लाख 65 हजार.
  • लातूर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. 17 लाख 14 हजार 188 मतदारांपैकी मराठा मतदार आहेत 4 लाख 77 हजार 500.
  • धाराशीव जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. एकूण मतदार आहेत, 14 लाख 808 मतदारांपैकी मराठा मतदारांची संख्या आहे 5 लाख 25 हजार.
  • परभणी जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघात 14 लाख 58 हजार मतदारांपैकी एकूण मराठा मतदार आहेत 4 लाख 76 हजार 500 मतदार आहेत.
  • हिंगोली जिल्ह्यात 3 विधानसभा आहेत…एकूण मतदार आहेत, 9 लाख 46 हजार 555. त्यापैकी 3 लाख 28 हजार मराठा मतदार आहेत.

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 48 विधानसभा मतदारसंघासह अहमदनगर अर्थात अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमध्ये जरांगे फॅक्टरचा प्रभाव आहे. त्यामुळं जरांगे इथंही कोणाचाही खेळ बिघडवू शकतात. जरांगेंच्या टार्गेटवर महायुतीतून फडणवीस आणि भाजपच आहे…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जरांगे अधिक आक्रमक बोलताना दिसत नाहीत. त्यामुळं पाडापाडी किंवा उमेदवार देण्याचं जरांगेंचं ठरलंच तर टार्गेटवर पूर्ण महायुतीच की भाजप हेही लवकरच दिसेल.