‘निवडणूक जाहीर होईल, अशी आशा बाळगू नका, त्याचे कारण की…’, जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 22, 2024 | 9:10 PM

"महाराष्ट्रमध्ये असंतोष आहे. खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ सारखी महाराष्ट्राच्या राजकारणात ही औलाद आहे. त्यामुळे ते स्वतःच अस्वस्थ आहेत. निवडणूक आयोग स्वायत्त राहिले असे माझे मत नाही", अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

निवडणूक जाहीर होईल, अशी आशा बाळगू नका, त्याचे कारण की..., जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य
आमदार जितेंद्र आव्हाड
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. याबाबात विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. “निवडणूक जाहीर होईल, अशा बाळगू नका. त्याचे कारण असे आहे की, महाराष्ट्रात येऊन निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करत नाही. निवडणूक आयोग नेहमी दिल्लीतून घोषणा करत असतं. त्यांना निवडणूक घ्यायची असेल तर त्यांनी हरियाणा बरोबरच घेतली असती. महाराष्ट्रात हवामान खराब आहे, असे कारण दिले. त्यांना महाराष्ट्र् निवडणूक घ्यायची नव्हती”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“महाराष्ट्रमध्ये असंतोष आहे. खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ सारखी महाराष्ट्राच्या राजकारणात ही औलाद आहे. त्यामुळे ते स्वतःच अस्वस्थ आहेत. निवडणूक आयोग स्वायत्त राहिले असे माझे मत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची वाट नाही तर वाटोळ झालं आहे. काही महिन्यांनी पगार देता येणार की नाही? अशी परिस्थिती आहे. मत विकत घेण्यासाठी आणली जाणारी योजना ही महाराष्ट्राला खड्ड्यात टाकणारी आहे. गॅसचे दर वाढले. बहिणींना सर्व कळतं, आपले भाऊ किती चोर आणि लबाड आहेत”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मुंबईतील मशिद वादाच्या घटनेवर काय म्हणाले?

“हा कोण शहाणा अधिकारी आहे ऑर्डर देणारा? एकीकडे महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मशीद, दर्गा याच्यावरून कारण नसताना वातावरण तंग करत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी फक्त हिंदू, मुसलमान संघर्षच काम येईल, असं त्यांना वाटत आहे. सत्तेसाठी हापापलेली माणसे घर जाळण्यासाठी मोकळी होतात. भोंगे वाजवणे बंद झाले, ही काय आताची प्रथा आहे का? साईबाबा, काकड आरती आणि  पंढरपूर असेल सर्वच ठिकाणच्या आरत्या बंद झाल्या. तुम्ही सर्वच बंद करून टाकले”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर केला.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांना अहिल्यादेवी नगर बँकेच्या 700 पदांच्या भरतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. “जी भरती होत आहे, त्याला अटीशर्ती आहेत. मागासवर्गीय ओबीसीला आरक्षण आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे आरक्षण लागू करणार नाही, असं जाहिरातीमध्ये लिहिलेला आहे, अशी जाहिरात का दिली? यांच्यावर एट्रोसिटी दाखल झाली पाहिजे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी भूमिका मांडली. “चिन्ह गेलं हे शरद पवारांना देखील टोचत असेल की माझ्या हातातलं घड्याळ त्यांनी पळवलं”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.