छुप्या पद्धतीने देशात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादचे काम सुरू – फडणवीस

| Updated on: Sep 30, 2024 | 7:14 PM

देशात मोठ्या प्रमाणात धर्मातर करण्याचे काम छुप्या पद्धतीने सुरु आहे. देशातील लोकांनी याबाबत जागृत असलं पाहिजे. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही पण हिंदूंना त्रास दिला जात असेल तर हिंदूंना जागृत केले पाहिजे. देशात आता वोट जिहाद ही पाहायला मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

छुप्या पद्धतीने देशात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादचे काम सुरू - फडणवीस
Follow us on

देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हटले की, गेले काही महिने माझ्या डोक्यात होतं की गाय आपल्या घरी पाहिजे. आज तुम्ही मला गो माता भेट दिली. आजच आम्ही गो मातेला राज्य मातेचा दर्जा दिला आहे. देशी गाईना प्रतिदिन 50 रुपये देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला आहे. आपल्या वाणीने जग जिंकण्याच काम स्वामी विवेकानंद यांनी केलं होतं. हीच हिंदू धर्माची ताकद आहे. गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांना मंदिरात जायला भीती वाटायची. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सगळ्या मंदिरात जातात. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट देखील होतं. कालपर्यंत मंदिरापासून दूर पळणारे राहुल गांधी आज मंदिरात जायला लागलेत. ही हिंदू धर्माची आणि संत परंपरेची ताकद आहे.

‘राहुल गांधीही मंदिरात जावू लागले’

‘माननीय पवार साहेब यांनी राजकीय जीवनात ५० वर्षा नंतर आध्यात्मिक आघाडी सुरू केली. शरद पवार मंदिरात जाऊ लागले. पंढरपूरच्या वारीत चालू लागले आणि अन्य मंदिरात जाऊ लागले. ही या भूमीतल्या संतांची ताकद आहे. ज्ञानवापीचं मंदिर देखील हळूहळू आता समोर येऊ लागला आहे.’

‘आपल्या देशात पुन्हा एकदा संत परंपरेचं महिमा गाणं सुरू झाले आहे. मागील काही वर्षात ही संत परंपरा संपावी असा काहीजणांनी प्रयत्न केला. या परंपरेला बदनाम देखील केलं. जेव्हा जेव्हा आपला हिंदू धर्म कमकुवत झाला तेव्हा आपण गुलामीत गेलो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा देश गुलामीत गेला त्यावेळी संतांनीच प्रबोधन केलं आहे. आपली संस्कृती आणि धर्म आपण विसरतो तेव्हा आपण पारतंत्र्यात जातो. भारत आता ज्या पद्धतीने विकास करतोय ते पाहिल्यावर अनेक देशांना वाटतं प्राचीन भारतासारखा बलशाली हा देश पुन्हा तयार होत आहे. म्हणूनच एक जागतिक षडयंत्र आपल्या देशात पाहायला मिळत आहे.’

देशातील लोकांना नास्तिकतेकडे नेण्याचा प्रयत्न – फडणवीस

‘अनेक संघटना या देशात पैसा पुरवून देशातील लोकांना नास्तिकतेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. असे लोक आणि संस्थांना दुर्दैवानं राजकीय आश्रय देखील मिळत आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा लव्ह जिहाद बद्दल बोललं जायचं तेव्हा आम्हालाही वाटायचं ही एखादी घटना आहे. मात्र आता हे प्रमाण वाढत आहे. हे लोक हे सगळं आता ठरवून करत आहेत. हा लव जिहाद आहे हेच आता स्पष्ट होत आहे.’

‘लोकसभा निवडणुकीत देखील वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. मालेगावची निवडणूक आणि तिथला निकाल आपल्यासमोर आहे अनेक विधानसभा मतदारसंघात पुढे असलेला महायुतीचा उमेदवार फक्त एका मालेगाव मध्य मतदारसंघात लीड तोडून पुढे गेला आणि चार हजारांनी आपल्या उमेदवाराचा पराभव झाला.’

वोट जिहादला गांभीर्याने घ्या – फडणवीस

‘निवडणुकीतील हार जीत महत्वाची नाही. मात्र ही या जिहाद पद्धतीकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आमचा कोणत्याही जाती धर्माला विरोध नाही. मात्र हिंदू लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल तर संतांची देखील जबाबदारी आहे की त्यांनी हिंदूंना जागृत केले पाहिजे. छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात सध्या देशात धर्मांतराचे काम सुरू आहे. एखाद्या देशात हिंदू कमी झाल्यानंतर राष्ट्रविरोधी कारवाया सुरू होत असतील तर काय परिस्थिती येईल याचा फक्त विचार करा. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा जगातील सर्वात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते. ही हजारो वर्षाची संस्कृती जपण्याची आपल्यावर जबाबदारी आहे.’ असं ही फडणवीस म्हणाले.