Godavari Express ganesh utsav: देशभरात घराघरात आज गणरायाचे आगमान झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात बच्चे कंपनीसह सर्वच गटातील लोकांना विघ्नहर्ता गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. परंतु मनमाड-नाशिककरांची गेल्या 28 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा यंदा खंडीत झाली आहे. यंदा गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गोदावरीचा राजा बसवण्यात आला नाही. पासधारकांच्या बोगीमध्ये विराजमान होणारा बाप्पा यंदा बसवण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला. त्यामुळे ही परंपरा खंडीत झाली. मनमाडमध्ये चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर जमत रेल्वे प्रशासनाचा निषेध करत आपला संताप व्यक्त केला.
गणेशोत्सवात अनेक जणांना सुट्टी नसते. त्यामुळे गोदावरी एक्स्प्रेसमध्ये नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेतील एका डब्ब्यात गणपती बसवण्याची परंपरा सुरु केली. मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा सुरु होती. रेल्वे प्रवासी संघटना आणि गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे दरवर्षी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात होती. परंतु यंदा धावत्या रेल्वेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला. यामुळे धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमधील गणरायाचा प्रवास यंदापासून थांबणार आहे.
गोदावरी एक्स्प्रेस ही गाडी नाशिक जिल्ह्याासाठी होती. पुढे तिला धुळ्यापर्यंत वाढवण्यात आली. मनमाडवरुन धुळे या वाढलेल्या टप्प्यास चाकरमाने विरोध करत होते. परंतु रेल्वेने प्रवाशांचा विरोध डावलून ही गाडी धुळ्यापर्यंत नेली. त्यानंतर आता मनमाड, लासलगाव आणि नाशिकमधील चाकरमाने गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवत होते.
गाडीच्या पासबोगीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विविधत स्थापना केली जात होती. अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जात होते. चाकरमाने दहा दिवस मनोभावे पूजा-आरती करत होते. भजन, कीर्तन होते होते. परंतु यंदापासून गोदावरील एक्स्प्रेसमध्ये गणराया नसणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशीसुद्धा नाराज झाले आहेत.