बाळासाहेब थोरात यांच्याकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची धुरा काँग्रेस हायकमांडनं दिल्यानंतर जागा वाटपावर तोडगा निघताना दिसतोय. सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीत काँग्रेसला 100-105 जागा, ठाकरेंची शिवसेना 96-100 जागा, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 80-85 जागा लढणार असल्याची माहिती आहे.
काही जागांवरुन पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद झाल्यानंतर थोरातांकडे चर्चेची धुरा सोपवण्यात आली. त्यानुसार सकाळी बाळासाहेब थोरातांनी शरद पवारांची भेट घेतली. सिल्व्हर ओकवर जवळपास तास भर चर्चा झाली. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंसोबत विदर्भातल्या वाद असलेल्या जागांवर थोरातांची चर्चा झाली.
उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाल्यानंतर ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही हजर होते. इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. विदर्भातल्या जागांसाठी ठाकरेंना काँग्रेससमोर लोटांगण घालण्याची वेळ आल्याची टीका बावनकुळेंनी केली.
विदर्भातल्या काही जागांवरुन पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद वाढला होता. पण शरद पवारांची मध्यस्थी आणि त्यानंतर थोरातांकडे चर्चेची जबाबदारी दिल्यानंतर तोडगा निघताना दिसतोय.
राज्यात भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन आघाडी घेतली आहे. दुसऱ्या यादीसाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच इच्छूक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पण असलं तरी आपल्याला तिकीट मिळणार की नाही याची धाकधूक देखील उमेदवारांना लागली आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार आपल्या पक्षातील नेत्यांची भेट घेत आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली असून आता उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार आहे. पण महायुती आणि महाविकासआघाडीत काही जागांवरुन अजूनही रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.