देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रवी राणांच्या उमेदवारीला हिरवा कंदील? भाजपमधून विरोध

| Updated on: Oct 18, 2024 | 8:57 PM

अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणा आणि स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. बडनेरातून रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी विरोध केला. तर दुसरीकडे रवी राणा आणि बच्चू कडू यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ला केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रवी राणांच्या उमेदवारीला हिरवा कंदील? भाजपमधून विरोध
Follow us on

अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात रवी राणा आणि भाजपच्या तुषार भारतीयांमध्ये जोरदार जुंपली आहे. बडनेरामधून उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीसांकडून हिरवा कंदील मिळाल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते तुषार भारतीय देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून रवी राणांना त्यांनी विरोध केलाय. दरम्यान रवी राणांना भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध का आहे? ते जाणून घेऊयात.

बडनेरा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार देण्याची स्थानिक नेत्यांची मागणी आहे. सध्या बडनेरा मतदारसंघात युवा स्वाभिमानचे रवी राणा आमदार आहेत. रवी राणा यांचा युवा स्वाभीमान पक्ष हा महायुतीसोबत असल्यानं मलाच उमेदवारी मिळेल असा राणांचा दावा आहे. लोकसभेत रवी राणांच्या पत्नी नवनीत राणांनी देखील भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्या सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे महायुतीनं बडनेरासह मेळघाट, अचलपूरची जागा युवा स्वाभिमानला सोडण्याची रवी राणांची मागणी आहे.

तर अनेक वर्षांपासून बडनेरामध्ये भाजपचं काम करत असल्यानं उमेदवारी मिळावी अशी मागणी तुषार भारतीय यांनी केली आहे. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत बडनेरामधून रवी राणांच्या विरोधात शिवसेनेच्या प्रिती बंड मैदानात होत्या. रवी राणांना 90 हजार 460 मतं
तर शिवसेनेच्या प्रिती बंड यांना 74 हजार 919 मतं मिळाली होती. जवळपास 15 हजार 541 मतांनी रवी राणा यांनी प्रिती बंड यांचा पराभव केला होता.

एवढंच नव्हे तर लोकसभेत नवनीत राणांच्या पराभवाचं खापर रवी राणांनी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांवर फोडलं होतं. भाजपसोबत राहून काही कटप्पा भाजविरोधात काम करत असल्याचा आरोप देखील राणांनी केला होता. एकीकडे नवनीत राणांच्या पराभवाचं खापर रवी राणांनी स्थानिक भाजप नेत्यांवर फोडलं. तर दुसरीकडे बच्चू कडूंनी देखील एक मोठा दावा करत रवी राणांवर टीकास्त्र डागलं. नवनीत राणा खासदार होऊ नये हीच रवी राणांची इच्छा होती असं म्हणत कडूंनी शरसंधान साधलं.

बच्चू कडूंनी रवी राणांबरोबर मविआ आणि महायुतीवर देखील टीकास्त्र डागलंय. येणाऱ्या 4 नोव्हेंबरला मोठा राजकीय स्फोट होणार असल्याचा दावा बच्चू कडूंनी केलाय. तसंच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील बच्चू कडूंनी इशारा दिलाय.

बडनेरात स्थानिक भाजप नेत्यांनी रवी राणांना विरोध केलाय. त्यामुळे बडनेरात आगामी काळात कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे येणाऱ्या 4 तारखेला कोणता राजकीय स्फोट होणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलंय.