महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत येत्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. दोन्ही आघाडी आणि युतीमध्ये प्रमुख तीन, तीन पक्ष आहेत. त्याचवेळी इतर छोटे पक्षही सहभागी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादुल मुस्लमीन म्हणजेच एआयएमआयएमने (AIMIM) महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीला एआयएमआयएमने प्रस्ताव दिला आहे. त्याचे उत्तर अजून AIMIM ला मिळाले नाही. यामुळे आता AIMIM ने अल्टीमेटम दिले आहे. मविआने येत्या 9 सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय AIMIM घेणार आहे. माजी खासदार AIMIM चे नेता इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली.
इम्तियाज जलील यांनी सांगितले की, आमची आणि शिवसेना उबाठाची विचारसरणीत मतभेद आहे. त्यानंतर राजकीय तडजोड म्हणून आम्ही शिवसेना उबाठा मविआमध्ये असताना युती करण्यास तयार आहोत. कारण आम्हाला राज्यातील शेतकरी आणि लोकांचे हित महत्वाचे आहे. ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची परिस्थिती मजबूत आहे, त्या जागा आम्ही लढण्याचा प्रस्ताव मविआला दिला आहे. आता आम्हाला मविआकडून उत्तराची अपेक्षा आहे, असे जलील यांनी म्हटले.
एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील म्हणाले, ‘एआयएमआयएम राज्यात किती जागा लढवणार? हे आम्ही अजून निश्चित केले नाही. सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत AIMIM ने 44 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन ठिकाणी यश मिळाले होते. भाजपला 105, एकत्र असलेल्या राष्ट्रवादीला 56, एकत्र असलेल्या शिवसेना 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या.
जलील म्हणाले की, मविआच्या उत्तराची आम्ही 9 सप्टेंबरपर्यंत वाट पाहणार आहोत. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास आम्ही आमच्या इच्छुक उमेदवारांना फॉर्म वितरित करण्यास सुरुवात करू. भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी महायुतीने महाराष्ट्रात सरकार बनवू नये, अशीच आमची इच्छा आहे.