इस्लापूरच्या सभेतून शरद पवार यांनी पहिल्यांदाच मोठे संकेत दिले आहे. जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दृष्टी आणि शक्ती आहे. असं सांगत पवारांनी थेट जयंतरावांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले आहेत. इस्लामपुरात शिवस्वराज्य यात्रेचा समारोप झाला…या सभेत जयंत पाटलांच्या भाषणादरम्यान जयंत पाटलांवरुन मुख्यमंत्रिपदाची घोषणाबाजी झाली..त्यानंतर पवारांनी भाषणाच्या सुरुवातीलाच थेट संकेतच दिले आहेत.
इस्लामपुरात शरद पवार बोलले आणि इकडे मुंबईत सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना जयंत पाटलांनाच चिमटा काढला. शरद पवार असे कोणतेही संकेत देत नाहीत, सुप्रिया सुळेंचंही नाव पुढे आहे असं राऊत म्हणाले आहेत. शरद पवारांनी 2 महिन्यांआधी आमच्याकडून कोणीही स्पर्धेत नाही असं म्हटलं होतं. आता इस्मापुरात त्यांनी महाराष्ट्र सांभाळण्याची दृष्टी आणि शक्ती असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच महाविकास आघाडीत त्यांचीही राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आहे, हेच पवारांना सूचवायचं होतं.
TV9च्या कॉन्क्लेव्हमध्येही फडणवीसांनी शरद पवारांच्या डोक्यात 3-4 चेहरे आहेत. पण त्यात उद्धव ठाकरे नाहीत, असं म्हटलं होतं. तर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीत सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनीच चेहरा घोषित करण्याची वारंवार मागणी केली. पण काँग्रेस आणि शरद पवारांनी ती मागणी मान्य केलेली नाही. निकालानंतरच ठरवू असं काँग्रेसही म्हणतेय आणि शरद पवारही. अर्थात म्हणणंय स्पष्ट आहे, संख्याबळाच्या आधारेच ठरवलं जाणार. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वत: उद्धव ठाकरेचं नाव, काँग्रेसकडून पटोलेचं नाव आघाडीवर असताना शरद पवारांच्या वक्तव्यानं जयंत पाटलांचं नाव अॅड झालं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. आता लवकरच उमेदवारांची घोषणा होणार आहे. महाविकासआघाडी आणि महायुती दोघांकडून पहिली यादी उद्या जाहीर केली जाऊ शकते. मुख्यमंत्रीपदाबाबत दोन्ही ही आघाड्यांनी कोणताही चेहरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत निवडणुकीच्या निकालानंतरच शिक्कामोर्तब होणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.