Maharashtra Rain update : जवळपास दोन आठवड्यांपासून दडून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी साठी रेड अलर्ट दिला होता. तर पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी पालघरसाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर वाढू शकतो.
“पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रात हवामानात बदल होत आहेत. सौराष्ट्र आणि मध्य भारतात मान्सूनच्या माघारीची ही वेळ असल्याने, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागात अधूनमधून मुसळधार पाऊस पडू शकतो.” हवामान खात्याचे म्हणणे आहे की, मान्सून निश्चितपणे वेग घेत आहे आणि 26 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पाऊस पडू शकतो. पुढील चार दिवस सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
पुण्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट वेदर या खाजगी अंदाज संस्थेच्या माहितीनुसार, “सध्या बंगालच्या उपसागरावर दोन चक्री चक्रीवादळे आहेत. “एक वायव्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर आहे, तर दुसरा म्यानमारच्या दक्षिण अराकान किनाऱ्याजवळ आहे.”
ठाणे शहरात दुपारपासूनच संततधार सुरु आहे. संतधार सुरु असल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. ठाण्याला उद्या देखील ऑरेंज अलर्ट आहे. अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची तारांबळ उडाली आहे. कल्याणमध्ये जोरदार पावसामुले स्टेशन परिसरात पाणी साचले आहे. वाहतूक संत गतीने सुरु आहे.
वीस दिवसाच्या विश्रांतीनंतर नंदुरबारमध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. नंदुरबार जिल्ह्यात २० दिवसापासून पावसाने दांडी मारली होती. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची चांगले तारांबळ उडाली. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.