महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि कोकणात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. पुण्यात तर पावसाने अक्षरशः कहर केला होता. त्यामुळे पुण्यात एमडीआरएफची टीम आणि लष्कराला मदतीसाठी उतरावे लागले होते. शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतु आज रेड अलर्ट दिल्यामुळे पुण्यासह राज्यातील आठ जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मनोज जरांगे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि त्यावेळी विधानसभा निवडणुक लढवायची की नाही, हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज आणि उद्या दोन दिवसीय छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदार संघाची चाचणी शरद पवार हे करणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत उद्या निती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी कोणत्या बाबींवर भर देणार? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. निती आयोगाची उद्या १० वाजता राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटर इथं बैठक आहे. सर्व राज्याचे मुख्यमंत्री ९ः३० वाजता राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटर इथं पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ः४५ वाजता राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटर इथं पोहोचणार आहेत. या बैठकीला सकाळी १० वाजता सुरूवात होणार आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, या आठवड्याच्या सुरुवातीला आम्ही कमला हॅरिसला फोन केला होता आणि त्यांना सांगितले होते की त्या अमेरिकेच्या त्या महान राष्ट्राध्यक्ष असतील. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी आप नेते मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या कविता यांची न्यायालयीन कोठडी 31 जुलैपर्यंत वाढवली. तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची हजेरी झाली.
बाजारातील पाच दिवसांपासून सुरू असलेली घसरण शुक्रवारी संपुष्टात आली. BSE सेन्सेक्समध्ये 1,293 अंकांची उसळी नोंदवली गेली. नेस्ले वगळता सेन्सेक्समधील इतर सर्व समभाग नफ्यात होते. नेस्ले 0.07 टक्क्यांनी घसरला.
राज्यातील 1 कोटी 70 लाख शिधापत्रिका धारकांना या गौरी गणपतीत ‘आनंदाचा शिधा’ संच मिळणार आहे. या आनंदाचा शिधा कीटमध्ये 1 किलो प्रत्येकी रवा, चणाडाळ, साखर आणि 1 लीटर सोयाबीन तेल या शिधाजिन्नांचा समावेश असणार आहे. हे कीट वाटप 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. याबाबतची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मोरबे धरणक्षेत्रात 2407 मिमी इतका पाऊस झालेला आहे. सध्या मोरबेधरणात 74 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोरबे धरणात 15 जूनला फक्त 26 टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता . त्यामुळे 15 जूनपासून नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी कपात केल होते. आठवड्यातून संध्याकाळी तीन दिवस पाणी कपात करण्यात येत होतं. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या विभागीय बैठकीत शिवसेना समर्थित आमदार आशिष जैसवाल यांनी उपस्थिती लावली. आशिष जैसवाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघातुन अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. रामटेक मतदार संघ महायुतीमध्ये भाजपकडे आहे. त्यामुळे आशिष जैस्वाल भाजपकडून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडी संभ्रम निर्माण करत आहेत असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा संभ्रम आम्ही दाखवून दिला आहे. निवडणुकीत पावणेतीन लाखाने हरले तेव्हा आमच्या मनात संभ्रम नव्हता. अडीच लाख मतांनी हरलेल्या उमेदवारांनी बोलावे का? असा टोला त्यांनी आमदार आव्हाड यांनी मुनगंटीवार यांना लगावला.
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या याचिकेवर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. नागपूर जिल्हा न्यायालयाने 30 सप्टेंबरच्या आत त्यांच्या अपिलावर निकाल द्यावा अशी याचिका काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सुनील केदार यांना निवडणूक लढवता येणार नाही? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेसचा खोटा नेरेटिव्ह मीडियाने सेट करू नये. आम्ही बहिणींना 1500 रुपये देत असल्याने विरोधकांचे स्वप्न चक्काचूर झाले. इलेट्रिक बिल मोफत केल्याने विरोधकांना आता आपणदेखील मुक्त होऊ अशी भीती वाटत आहे. विरोधक लाडली बहीण विरोधात काही व्हिडिओ प्रसारात आहे. काँग्रेस नेत्यांना झोप येत नाही. आम्ही एकदा हरलो म्हणून प्रत्येक निवडणूक काँग्रेस जिंकणार नाही, असा टोला राज्यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कॉंग्रेसला लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मिळाला आहे. ठकारे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजी खासदार राजन विचारे यांचे हे कट्टर समर्थक आहे. आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे.
पुणे शहर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
“बच्चुभाऊ म्हणतात ते खरं आहे, बच्चू कडू हे शेतकऱ्यांची भूमिका मांडणारे आहेत, हे आशिष शेलार यांनी समजून घ्यायला पाहिजे. प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. मराठ्यांना चॅलेंज करू नका. मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागले असे समजू नका. मी जर बिघडलो तर तुम्हाला तोंड बाहेर काढता येणार नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पर्लाकोटा पासून बंद. तीन फूट पाणी अजून वाहत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पूर ओसरत असला, तरी दोन राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील जवळपास 15 मार्ग बंदच. इंद्रावती, वैनगंगा या दोन नद्यांचा पूर ओसरत आहे. गडचिरोलीतील दक्षिण भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र सध्या दिसत आहे.
लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय झाली आहे. या योजनेत लाखो महिलांचे अर्ज दाखल झाले आहे. या अर्जांनी पण एक विक्रम केला आहे. पण आता राज्याच्या वित्त विभागाची डोकेदुखी वाढली आहे. या योजनेच्या हजारो कोटींच्या खर्चावरुन खात्याला घाम फुटला आहे.
लाडकी बहीण योजना लोकप्रिय होत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून महाविकास आघाडी यावर टीका करीत आहे. संजय राऊत यांनी आपले सरकार आल्यास ही योजना बंद करू असे म्हटले आहे. याची दखल भगिनींनी घ्यावी. मोदी आणि अमित शहा यांना शत्रू मानायचे हे यांचे काम आहे. मोदी सरकार कार्यक्षम नाही, अशी टीका होत आहे. मग उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री कसे बनले ? राऊत यांनी लायकीत राहावे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
मुरलीधर मोहोळ एकता नगर मधील नागरिकांशी संवाद साधत आहेत. एकता नगर मधील नागरिक मुरदर मोहन यांच्यासमोर कैफियत मांडत आहेत. नदीपात्रातील रस्त्याचा भराव टाकल्यामुळे पाणी एकता नगर मध्ये घुसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.
शिर्डी ग्रामस्थांचा साई संस्थान विरोधात भव्य मोर्चा काढला. मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि शिर्डीतील व्यावसायिक मोर्चात सहभागी झाले आहेत. मंदिराचे चारही प्रवेशद्वार खुले करा, साई मंदिराबाबत कुठलाही निर्णय करताना ग्रामस्थांना विश्वासात घ्या, यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले.
मागच्या 25 वर्षात मुंबईत पाऊस पडला की शिवसेनेवर टीका होत होती, आता तिथे दोन वर्षे शिवसेनेची सत्ता नाही नाही. पुण्यात तर भाजपची सत्ता आहे, पुण्यात मुलं पोहत आहे. उपमुख्यमंत्री वार रूम मध्ये जाऊन पाहतात ,त्याने काय होतात. याला फक्त सत्ताधारी जबाबदार आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे दर्शन घेतले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिळ्या कडीला ऊत आणू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी एफआयआर का दाखल केला नाही, असा सवाल पण त्यांनी केला.
गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याची नक्षलवाद्यांनी केली हत्या केली. जयराम गावडे हा नक्षल चळवळीत त्याच्या पत्नीसोबत काही वर्षापासून होता. आठ वर्षांपूर्वी हे दोघे दांपत्य गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे शेतीच्या व्यवसाय करीत होते. काल रात्रीच्या वेळी 12 ते 15 नक्षलवादी येऊन जयराम गावडे ची हत्या केली.
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतांमध्ये साचलं पाणी.. जळगाव तालुक्यासह परिसरातील गावांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं आहे… शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लाडकी बहीण योजनेवर वित्त विभागाला चिंता व्यक्त केली आहे. महिला, मुलींसाठी आधीपासूनच योजना, त्यानवर कोट्यवधींता खर्च… तरी देखील लाडकी बहीण योजनेची काय गरज? वित्त विभागाचा सवाल
कोलदा ते चिचपाडा दरम्यान मुसळधार झालेला पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी…. नंदुरबार जिल्ह्यात आणि गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा फटका रेल्वेला बसत आहे….सध्या पाऊस कमी झाला असला तरी सकल भागात पाणी साचलं आहे….
काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी बनल्या आहेत…. लोकसभेत भाजपला पाठिंबा आणि महिन्याभरात स्वबळाचा नारा… असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
राज्यात दिखावा करणारे अनेक जण… महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती राज ठाकरेंनी समजून घ्यावी… राज ठाकरे नुकताच परदेश दौऱ्यावरून परतले…. काही लोक बोलतात एक आणि करतात एक… संजय राऊतांचा टोला..
चंद्रकांत पाटलांकडून पुण्यातील नुकसानग्रस्त भागाचा आढावा… पुण्यात चंद्रकांत पाटलांकडून म्हात्रे पुलावर पाहणी
नीती आयोगाची शनिवारी सकाळी बैठक होणार आहे. या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. त्यासाठी आज मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत जाणार आहे. बैठकीच्या निमित्ताने शिंदे यांच्या राजकीय भेटीही होण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा धरण प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून एकूण १५७८५ क्यूसेक इतका विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.
नांदुर मधमेश्वर येथील धरणातून गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ११ हजार ७९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आज शुक्रवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. रात्रीतून पावसाचा वेग वाढल्यास पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे
मुंबईच्या मातोश्री परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बनवायचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. तसे बॅनर लावले आहे. 27 जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधमात साजरा केला जाणार आहे.
राहुल गांधी यांच्या विरोधातील 6 वर्षापूर्वीच्या प्रकरणात आज सुल्तानपुर न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालयात त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी कर्नाटक इथं पत्रकार परिषदेत बोलताना अभद्र भाषेचा वापर केला म्हणून राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी खटला दाखल केला आहे.