मराठ्यांची ताकद तिथे उमेदवार उतरवणार, जरांगेंची घोषणा, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट

| Updated on: Oct 20, 2024 | 3:12 PM

मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षपणे आपले उमेदवार उतरवणार की नाही? याबाबतची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. जरांगे यांनी आपली भूमिका मांडताना तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

मराठ्यांची ताकद तिथे उमेदवार उतरवणार, जरांगेंची घोषणा, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट
manoj jarange patil
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज मोठा दिवस आहे. कारण मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आपली भूमिका जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण ज्या ठिकाणी मराठा समाजाची ताकद आहे तिथे उमेदवार देणार, असं त्यांनी जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांनी आज आपल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली. मनोज जरांगे यांनी यावेळी सुरुवातीला आपली स्वत:ची निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर त्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. या मुद्द्यांमध्ये आपण कुठे उमेदवार उभे करणार आणि कोणत्या मतदारसंघात कुणाला पाठिंबा देणार? याबाबत जरांगे यांनी अधिकृतपणे भूमिका मांडली.

मनोज जरांगे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :

  • जिथे आपले उमेदवार निवडून येऊ शकतात तिथे मराठा समाजाचे उमेदवार उभे करु, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
  • एससी आणि एसटीच्या जागा आहेत तिथे जो आपल्या विचाराचा आहे तिथे लाखभर मतदान देवून त्या उमेदवाराला निवडून द्यायचं, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.
  • तिसरा मुद्दा असा आहे, जिथे आपण उमेदवार उभा करणार नाही, जो आपल्याला ५०० रुपयांच्या बॉन्डवर लिहून देईल की, मी तुमच्या सर्व मागण्यांशी सहमत आहे त्याला निवडून देऊ. अन्यथा त्याला पाडू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
  • कुठे मराठ्यांची ताकद आहे, कुठे मुस्लिमांची ताकद आहे ते गणित पाहणं गरजेचं आहे. कारण ते समीकरण जुळवणं देखील महत्त्वाचं आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळलं तर अवघड आहे, असं जरांगे यावेळी म्हणाले.
  • तुम्ही फॉर्म भरुन टाका. पण फॉर्म काढ म्हटलं तर काढायचा, असे आदेश जरांगे यांनी आपल्या ठरलेल्या उमेदवारांना दिले.

मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन काय?

“ज्याला आपली मागणी मान्य आहे, जो आपल्या विचाराचा आहे त्याला मतदान द्यायला काय हरकत आहे. मी म्हटलं का तुम्हाला हे निवडून आणा ते निवडून आणू नका, मी आपल्या विचाराचा म्हणालो आहे. आता आपण बघणार आहोत कोणत्या जागेवर उमेदवार उभे करायचे, फॉर्म भरून घ्यायचे, अर्ज मागे घेतले तरी पैसे बुडत नाहीत मी विचारून घेतलं. कुठे मराठ्यांची ताकद आहे, कुठे मुस्लीमाची ताकद आहे हे समीकरण जुळलं तरच त्याच्यात मजा आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“एका जागेवर सीट निवडून येत नाहीत हार होईल, मी समीकरण जुळवतोय, जर नाही जुळलं तर अवघड आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज भरून ठेवा. फॉर्म भरला की आपण सांगून देऊ, यांना फॉर्म काढून घ्यायचा, यांना ठेवायचा, तरीसुद्धा फॉर्म ठेवला तर आपण समजून घ्यायचं की त्यांनी पैसे घेतले आणि आपल्या विरोधात उभा राहिला. फॉर्म काढ म्हटलं की, काढायचा तोपर्यंत समीकरण जुळतात का ते बघतोय. या चार-पाच दिवसात मी पटापट काम करतो आणि कोणत्या मतदारसंघात सीट निघते ते बघतो आणि कोणत्या मतदारसंघात पाडायचे ते सांगतो”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील म्हणाले.