मनोज जरांगे यांची सभा रद्द, आता उपोषण सुरु करणार, मराठा आंदोलनाबाबत दोन मोठे निर्णय

| Updated on: May 16, 2024 | 3:17 PM

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची बीडमधील नारायणगड येथे सभा होणार होती. त्यासाठी 400 एकर मैदानावर तयारी सुरु होती. सभेला लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार होते. परंतु ही सभा आता रद्द करण्यात आली आहे.

मनोज जरांगे यांची सभा रद्द, आता उपोषण सुरु करणार, मराठा आंदोलनाबाबत दोन मोठे निर्णय
मनोज जरांगे पाटील
Follow us on

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दोन मोठे निर्णय जाहीर केले. मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी सभा तुर्त रद्द केली आहे. या सभेच्या आधी 4 जूनपासून मनोज जरांगे पाटील उपोषण करणार होते. परंतु आता सभा रद्द झाल्यामुळे उपोषणाची नवीन तारीख जाहीर करण्याचा दुसरा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. सभा पुढे ढकल्यामुळे आता 4 जून पूर्वी उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

का करण्यात आली सभा रद्द

बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट येथे झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत. त्यांची भेट त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येत्या 8 जून रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमधील नारायणगड येथे सभा होणार होती. त्यासाठी 400 एकर मैदानावर तयारी सुरु होती. सभेला लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार होते. राज्य सरकारला धडकी भरवणारी ही सभा असेल, असा दावा आंदोलकांकडून करण्यात येत होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे.

मुंडे बहीण-भावावर मनोज जरांगे यांचा घणाघात

बीडमध्ये हा जो प्रकार सुरू आहे तो आता निवडणुकीनंतर होणे मला अपेक्षितच होते. मराठा मताची त्यांना गरज आहे, परंतु मराठा समाज बांधवांची नाही. त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे. मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ, तुला जीवे मारू, असे म्हटले जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, असे देखील म्हटले जात आहे. परंतु मुंडे बहीण-भावाने एक लक्षात घ्यावे मला बीडमध्ये येऊ दिले नाही तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

बैठकीत ठरणार सभेची नवीन तारीख

नारायण गडावरील सभेवर दुष्काळाचे सावट होते. त्या परिरात भीषण दुष्काळ पाहता सभा रद्द करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने सभा रद्द करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
आता मराठा समाजाच्या पुढील बैठकीत सभेची तारीख निश्चित होणार आहे.