देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र ते राज ठाकरे यांचा स्वबळाचा नारा, दीपक केसरकर काय-काय म्हणाले?

| Updated on: Jul 26, 2024 | 5:09 PM

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर मनमोकळेपणाने भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर मनोज जरांगेंकडून सरकारवर निशाणा साधला जातोय. या सर्व घडामोडींवर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात षडयंत्र ते राज ठाकरे यांचा स्वबळाचा नारा, दीपक केसरकर काय-काय म्हणाले?
मंत्री दीपक केसरकर
Follow us on

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मदत केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारलं असता, “अजून निवडणुकीला उशीर आहे. प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो. आमची महायुती असून मागच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत. म्हणून जेव्हा त्यांच्याशी बोलणं होईल तेव्हा नक्कीच त्यांचा मतपरिवर्तन होईल”, असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले. पुण्यात आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘तर आम्ही सहज दुसरा गट तयार केला असता’

यावेळी दीपक केसरकर यांना आमदार अपात्रेबाबत सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईबाबत विचारलं असता, “न्यायालयीन प्रक्रिया ही बराच काळ चालत असते. त्यामुळे हा मेजर निर्णय होणार आहे. एक व्यक्ती लोकशाहीत निर्णय घेऊ शकतो का? कोणताही निर्णय घेताना पक्षाची बैठक बोलावली पाहिजे. पण असं झालेलं नाही. आम्हाला जर यातून सुटायचं असतं तर आम्ही सहज दुसऱ्या पक्षात किंवा दुसरा गट तयार केला असता. पण मी हे केलेले नाही”, असं केसरकर म्हणाले.

“आमची लोकशाहीच्या रक्षणासाठी ही लढाई आहे. आमदारकी पणाला लावून आम्ही लोकशाहीची ही लढाई लढत आहोत आणि यात आम्हाला यश येईल, याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे. आज जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार म्हणत आहेत त्यांनी आरश्यात पाहावं. कारण सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, आमदारांनी निवडून आणलेलं हे सरकार आहे. यांना काम करण्याचा अधिकार आहे. उगाच विरोधक खोटं आणि रेटून बोलत आहेत”, असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला.

‘फडणवीस यांच्याविरोधात मोठं षडयंत्र’, दीपक केसरकर यांचा दावा

यावेळी दीपक केसरकर यांना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फार मोठं षडयंत्र केलं जात आहे. खरंतर मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून ते आरक्षण टिकवलं होतं. महाविकास आघाडीने ते आरक्षण टिकवलं नाही. आता आम्ही दिलेलं आरक्षण हे देखील टिकणारं आरक्षण आहे. हे जे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे मराठा समाजात समाधानाची बाब आहे. पण त्यांनी अशी भूमिका घेतल्याने वातावरण बिघडत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे”, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली.

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आता आमदार पाडण्याची भूमिका घेतली जात आहे. याबाबत दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला. “मारने से बचाने वाला बडा होता हैं. वाचवणारा हा देव असतो आणि मारणारा हा माणूस असतो आणि मारणाऱ्यांपेक्षा तारणारा हा मोठा असतो. मनोज जरांगे पाटील हे सेन्सिटिव्ह असून त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या लोकप्रियतेचा वापर दुसरे लोक करत आहेत आणि त्यांना बळी देण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं दीपक केसरकर म्हणाले.