सवाल आणि खडेबोल, भाजपच्या ‘एक देश, एक निवडणूक’वर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Sep 18, 2024 | 8:12 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एक देश, एक निवडणूक' निर्णयावर केंद्र सरकारचे कान टोचले आहेत. केंद्रीय कॅबिनेटने याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच केंद्र सरकारला खडेबोल सुनावलं देखील आहे.

सवाल आणि खडेबोल, भाजपच्या एक देश, एक निवडणूकवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
राज ठाकरे
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी या निर्णयावरुन केंद्र सरकारला खडेबोल सुनावले देखील आहे. “एक देश एक निवडणूक संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी”, असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे.

“बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

“पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचले.