अजित पवार यांना शरद पवार यांच्या कर्तृत्वाची जाणीव, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काकांबद्दल कृतज्ञता व्यक्त

| Updated on: Jun 10, 2024 | 6:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शरद पवार यांनी 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व केलं. त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांना शरद पवार यांच्या कर्तृत्वाची जाणीव, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काकांबद्दल कृतज्ञता व्यक्त
अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन्ही गटांकडून आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी शुभेच्छा देतो. आठवणींना उजाळा देण्याचं काम मान्यवरांनी केलं. मी ही त्यातला साक्षीदार आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी आपल्या अनेक आमदारांना त्रास व्हायला लागला होता, मग कसं पुढं जायचं? मग सोनिया गांधी परकीय असल्याचा मुद्दा आणला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मंत्री छगन भुजबळ त्यावेळी पायाला भिंगरी बांधून फिरत होते. त्यांनी महाराष्ट्र फिरून काढला. आज महत्त्वपूर्ण नेते आपल्यात नाही, याच दु:ख आहे. शरद पवार यांनी 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व केलं. त्यांची देखील कृतज्ञता व्यक्त करतो”, असं अजित पवार म्हणाले.

“11 महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तेव्हाही आपल्याला मंत्रिमंडळात 9 जागा मिळाल्या. तेव्हादेखील प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न केला. आपल्याला मंत्रिमंडळातही त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं. देशातील राजकीय वातावरण बदलत असतात. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या. मागच्या काळात शिवसेना-युतीच्या 42 जागा होत्या. नवनीत राणा भाजपसोबत गेल्या. त्यामुळे आपली ती जागा त्यांच्याकडे गेली”, असं अजित पवार म्हणाले.

‘कारण नसताना गैरसमज पसरवला जातोय’

“काल कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम काही लोकं करत होते. आम्ही अनेक जणं काल दिल्लीत होतो. आम्ही सर्वजण सकाळपासून एकत्र चर्चा करायचो. आम्ही प्रफुल्ल भाईंच्या घरीच होतो. आम्ही सर्वजण एकत्र होतो. कुठेही मतभेद नाहीत. कारण नसताना कधीकधी, मीडियातून आपण फार संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर एखादा शब्दांचा वेगळा अर्थ लावला जातो. नाही संवाद साधला तर आमच्याशी बोलले नाहीत म्हणून ते बोलतात. मग ते पाहिजे त्या बातम्या लावतात. त्यांनी मग त्यांनी काल ती बातमी चालवली”, असं अजित पवार म्हणाले.

‘राज्यसभेत आता 3 खासदार होणार’

“आपले सहकारी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खरं सांगितलं. भाजपने आम्हाला सांगितलं की, तुमची लोकसभेची एकच जागा आलेली आहे. आम्हाला तर तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे. पण मंत्रिपद देत असताना आम्हाला तुम्हाला स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद द्यायचं आहे. सुनील तटकरे यांनी मला आधीच सांगितलं होतं, आपला आज राज्यसभेत एक सदस्य आणि लोकसभेत एक सदस्य आहे. साधारण जुलै अखेपर्यंत किंवा 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला राज्यसभेचे 3 सदस्य झालेले बघायला मिळतील. राज्यसभेत आपली संख्या वाढलेली दिसेल”, असा दावा अजित पवार यांनी केला.

“आम्ही म्हणालो की, आमच्या प्रफुल्ल पटेल यांचं नाव द्यायचं आहे. त्यांनी स्वत: कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने स्वतंत्र प्रभार पाहायचा हे आम्हाला पटत नाही. तुम्ही वेगळा निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी सांगितलं की, शिवसेनेलाही स्वतंत्र प्रभार दिला. त्यांनी इतरही नावे सांगितलं. मग आम्ही त्यांना सांगितलं तर, तुम्हाला नाही द्यायचं असेल तर आम्ही एनडीएच्या बाहेर नाही, एनडीएच्या सोबत आहोत. पण आम्ही कोणतंही पद स्वीकारणार नाही. पण त्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या आणि विपर्यास देशात आणि राज्यात करण्यात आला. माझ्या कार्यकर्त्यांमध्ये त्या बातम्या पोहोचल्या. कृपा करुन कुणी गैरसमज करुन घेऊ नका. आपल्या परिवाराला धक्का लागता नको. विश्वासार्हता कमी होता कामा नये”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.