मुंबईत पहिल्या पावसात पहिला मोठा अपघात, इमारत झाली धस्स…

| Updated on: Jun 25, 2023 | 1:22 PM

कालपासून राज्यात पावसाने बरसायला सुरवात केली. मुंबईतही तो धुवाधार कोसळला नव्हे या पहिल्याच पावसाने मुंबईकरची त्रेधा तिरपीट उडविली.

मुंबईत पहिल्या पावसात पहिला मोठा अपघात, इमारत झाली धस्स...
GHATKOPAR ACCIDENT
Follow us on

मुंबई : गेले काही दिवस तो येणार अशी चर्चा होती. मग पुन्हा हवामान खात्याने नवा अंदाज दिला. अखेर, त्याने मुहूर्त काढलाच. कालपासून राज्यात पावसाने बरसायला सुरवात केली. मुंबईतही तो धुवाधार कोसळला नव्हे या पहिल्याच पावसाने मुंबईकरची त्रेधा तिरपीट उडविली. अनेक ठिकाणी पहिल्या पावसाने नदी तयार केली. काळाचौकी, लालबाग, परेल, घाटकोपर, सायन, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड तेथील परिसर जलमय झाला होता. अशातच पहिल्या पावसामुळे एक मोठा अपघात घडला आहे.

मुंबईमध्ये घाटकोपर येथेही जोरदार पाऊस झाला. मात्र, या पावसाचा जोर इथली एक इमारत सहन करू शकली नाही. राजावाडी परिसरात ही घटना घडली. राजावाडी परिसरातील चित्तरंजन नगर येथील राजावाडी कॉलनीमधील बिल्डिंग नंबर बी / 7 /166 ही तीन मजली इमारत जमिनीत धसली.

हे सुद्धा वाचा

इमारतीच्या जमिनीचा काही भाग धसल्यामुळे वरील तीन मजल्यांना तडे जाऊन काही भाग कोसळला. या इमारतीतील काही लोक आतमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेड, पोलीस, वॉर्ड स्टाफ, 108 रुग्णवाहिका, म्हाडा अधिकारी दाखल झाले आहेत. फायर ब्रिगेडचे जवान इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

फायर ब्रिगेडच्या जवानांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील 2 व्यक्तींची सुटका केली आहे, तर, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन व्यक्ती अडकले असून बचावकार्य सुरू आहे. तसेच, ढिगाऱ्याखालून सुमारे 30 वर्षे वयाच्या तीनपैकी एका पुरुष व्यक्तीची सुटका करण्यात आली असून अडकलेल्या 2 जणांना वाचवण्याचे काम सुरू आहे.

ह्या दुर्घटनेत एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, ही इमारत धसल्यामुळे बाहेर ऊभ्या असलेल्या गाड्यांचेही बरेच नुकसान झाले आहे.