ना सुनील राणे, ना गोपाळ शेट्टी, भाजपचा सर्वात मोठा डाव कुणावर?; बोरिवलीत काय घडणार?

| Updated on: Oct 28, 2024 | 4:55 PM

भाजपने विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत बोरिवली विधानसभा मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. भाजपने बोरिवलीत विद्यमान आमदार सुनील राणे यांचं तिकीट कापलं आहे. त्यांच्याऐवजी गोपाळ शेट्टी यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण भाजपने तिसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली आहे.

ना सुनील राणे, ना गोपाळ शेट्टी, भाजपचा सर्वात मोठा डाव कुणावर?; बोरिवलीत काय घडणार?
Follow us on

बोरिवली विधानसभा मतदारसंघाबाबतचा ट्विस्ट अखेर संपला आहे. कारण भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बोरिवलीसाठी भाजप नेते संजय उपाध्याय यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने बोरिवली मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना संधी देऊन धक्कातंत्राचा वापर केला आहे. या मतदारसंघात सुनील राणे हे विद्यमान आमदार आहेत. पण त्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. सुनील राणे यांचं तिकीट कापलं जाईल, अशी याआधीच चर्चा होती. त्यांच्याऐवजी भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. लोकसभा निवडणुकीवेळी गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्याने नाराज झालेल्या शेट्टी यांना खुश करण्यासाठी भाजप त्यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देईल, अशी चर्चा होती. पण भाजपने गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न देता धक्कातंत्राचा अवलंब करत संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली.

बोरिवली मतदारसंघात गेल्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने अशाप्रकारे धक्कातंत्राचा वापर केला आहे. बोरिवलीत गेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील राणे यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन भाजपचे मंत्री विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. विशेष म्हणजे विनोद तावडे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 1 लाख मतांच्या फरकाने जिंकून आले होते. पण भाजपने पुढच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं होतं. यानंतर आता सुनील राणे यांचंदेखील तिकीट कापून संजय उपाध्याय यांना संधी देण्यात आली आहे.

संजय उपाध्याय यांना याआधी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत संधी देण्यात आली होती. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संजय उपाध्याय यांना पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती. संजय उपाध्याय यांचं मुंबईत पक्षासाठी मोठं काम आहे. त्यांचे वडील देखील कित्येक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहेत. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. तसेच संजय उपाध्याय हे देखील लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करत आहेत.

बोरिवलीत काय घडणार?

बोरिवलीत विद्यमान आमदाराचं तिकीट कापण्यात आलं असलं आणि गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली नसली तरीदेखील भाजपला या जागेबाबत आत्मविश्वास आहे. त्यामागे कारणही तसं आहे. गेल्या 20 वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे. याशिवाय हा विधानसभा मतदारसंघ ज्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे तिथे सर्वत्र भाजपची चांगली ताकद आहे. त्यामुळे उमेदवार बदलले तरी भाजपला तिथे विजय मिळत आलेला आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत उत्तर लोकसभा मतदारसंघातून यावेळी पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते या मतदारसंघातून सहज निवडून आले होते. यानंतर बोरिवली विधानसभा मतदारसंघाचा इतिहासही तसाच असला आहे. या मतदारसंघात मराठी आणि गुजराती भाषित मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या मतदारांकडून भाजपला जास्त पसंती दिली जाते. पण यावेळी राज्यातील सत्तेची समीकरणं बदलली आहेत. राज्यातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे निकाल काय लागणार? याकडे महाराष्ट्राच लक्ष असणार आहे.