नवी मुंबईच्या राजकारणात भूकंपाची शक्यता, गणेश नाईक भाजप सोडण्याच्या तयारीत

| Updated on: Oct 18, 2024 | 8:12 PM

भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण नवी मुंबईतील भाजपचे बडे नेते गणेश नाईक हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नाईक हे ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत.

नवी मुंबईच्या राजकारणात भूकंपाची शक्यता, गणेश नाईक भाजप सोडण्याच्या तयारीत
Follow us on

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात जागावाटपासाठी आणि उमेदवार निश्चित करण्याबाबत खल सुरु आहेत. असं असताना सत्ताधारी भाजप पक्षाला अनेक हादरे बसताना दिसत आहेत. कारण भाजपमधील अनेक दिग्गज नेते महाविकास आघाडीत प्रवेश करताना दिसत आहेत. भाजपकडून विधानसभेचं तिकीट मिळत नसल्याने हे नेते विरोधातील पक्षांमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोल्हापूरच्या कागलचे समरजित घाटगे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील ही याबाबतच्या घटनांचे ताजे उदाहरणं आहेत. या दोन्ही भाजपच्या बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर आता भाजपला जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे हादरे बसण्याची दाट शक्यता आहे. कारण भाजपचे नवी मुंबईतील मोठे नेते गणेश नाईक हे ठाकरे गट किंवा शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. ते पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपला नवी मुंबईत सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजप आमदार गणेश नाईक आणि भाजप नेते संदीप नाईक हे भाजप सोडण्याची शक्यता आहे. गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातून तर संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत संपर्क सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गणेश नाईक आणि संदीप नाईक यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर त्यांनी विरोधी पक्षांत जावून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पण गणेश नाईक यांचा हा निर्णय भाजपसाठी आगामी काळात धोकादायक ठरु शकतो.

नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईकांचं वर्चस्व

गणेश नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण गणेश नाईक हे नवी मुंबईतील बडे प्रस्थ आहेत. त्यांचं नवी मुंबईच्या राजकारणात चांगलं वर्चस्व आहे. नवी मुंबई महापालिकेतील बहुतांश आमदार हे गणेश नाईक यांच्या विचारांचे आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांनी दुसऱ्या पक्षांत प्रवेश केला तर त्याचा प्रत्यक्ष फटका हा भाजपला बसण्याची शक्यता आहे.

गणेश नाईक भाजपमध्ये नाराज?

गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक हे भाजपात नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येत होती. लोकसभा निवडणुकीवेळी गणेश नाईक यांच्या समर्थकांकडून ठाणे लोकसभेच्या जागेसाठी आग्रह केला जात होता. गणेश नाईक आणि त्यांच्या चिरंजीवांनी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. पण ती जागा महायुतीत शिंदे गटासाठी सोडण्यात आली होती. त्यावेळी गणेश नाईक यांची मनधरणी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं.