शिवाजी महाराजांबद्दलचं ‘ते’ विधान जयंत पाटील यांना भोवणार?, भाजप आक्रमक; मागणी काय?

| Updated on: Sep 06, 2024 | 8:44 PM

"महाविकास आघाडीच्या लोकांना खंडणी वसूल करायची आणि खंडणी मागायची सवय आहे. पण आता महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली अशी मुक्ताफळं जयंत पाटील यांनी उधळली आहेत", असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

शिवाजी महाराजांबद्दलचं ते विधान जयंत पाटील यांना भोवणार?, भाजप आक्रमक; मागणी काय?
जयंत पाटील
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत स्वारीबाबत भाष्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या सुरत लुटीबाबत केलेल्या वक्तव्यावर आजच्या कार्यक्रमात खुद्द फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं म्हणणं चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली होती, असं म्हटलं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं. फडणवीस यांच्या याच वक्तव्याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. पण त्यांच्या प्रतिक्रियेतील एका शब्दावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा आक्षेप आहे. जयंत पाटील यांनी शिवप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

“महाविकास आघाडीच्या लोकांना खंडणी वसूल करायची आणि खंडणी मागायची सवय आहे. पण आता महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली अशी मुक्ताफळं जयंत पाटील यांनी उधळली आहेत. हे शब्द वापरताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. शिवरायांच्या घोर अवमान केल्याबद्दल जयंत पाटील यांनी तमाम शिवप्रेमींची तातडीनं जाहीर माफी मागावी”, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना संबंधित वक्तव्य भोवणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

“शब्दच्छल करण्यात फडणवीस पटाईत आहेत. त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. महाराजांना स्वराज्य वाढवण्यासाठी संपत्तीची गरज होती. फक्त सिंधुदुर्ग किल्लाच नाही काही किल्ले आहेत. तिकडून खजिना आणला. १०० कोटीहून खजिना मिळाला. सुरत लुटली हे स्वराज्य वाढवण्यासाठी लुटली. पण सुरत लुटली हा शब्द बोलण्याचं धाडस नाही. कारण अमित शाह आणि मोदी विचारतील. आप कैसे बोल रहो हो? असं विचारतील”, असं जयंत पाटील म्हणाले.

“लुटली म्हणजे लुटारू नाही. नादीरशाहने सरसकट लूट केली होती. तसं महाराजांनी केलं नाही. महाराजांनी यादी तयार केली. पारेख म्हणून कुटुंब होतं. त्याच्या घरात मृत्यू झाला होता. महाराजांनी त्यावर फुली मारली. तिथे जाऊ नका म्हणून सांगितलं. त्यांनी सूरतला नोटीस पाठवली आणि खंडणी मागितली. त्यांनी सुरत लुटली. लुटले म्हणजे लुटारू नाही. लुटारू घरे भरणारे असतात. महाराष्ट्र हा दगडधोंड्याचा महाराष्ट्र आहे. त्यावेळी महाराष्ट्रात एवढी संपत्ती नव्हती. सुरतमध्ये संपत्ती होती. त्यामुळे संपत्ती वाढवण्यासाठी हा हल्ला करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी लूट केली. त्यांनी स्वतच्या जनतेला जपणारा राजा होता. ते आता नरेटिव्ह सेटल करत आहेत. ही स्टाईल त्यांना मारक होत आहे. महाराजाने दोन वेळा सुरत लुटली. स्वारी सुरतेवर केली. आम्हीही तिला स्वारीच म्हणतो. सुरतेवर छापा मारून मिळवलेली संपत्ती महाराजांनी राज्यात आणली. राज्यासाठी वापरली. हे सांगताना ते घाबरत आहेत”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती.

भाजपच्या आरोपांना शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर

प्रवीण दरेकर यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ट्विट करत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “होय… ‘खंडणीच’ शब्द. इतिहास काय सांगतो… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती ही १९०६ मध्ये प्रसिद्ध झाली. या चरित्राच्या भाग एकविसाव्यातील पान क्रमांक ३५५ वर ‘खंडणी’ या शब्दाचा उल्लेख आढळून येतो”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“१६७० साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दुस-यांदा सुरत लुटून पुन्हा स्वराज्याकडे मोर्चा वळवला, त्यावेळी त्या शहरातील रहिवाशांना उद्देशून महाराजांनी एक पत्र लिहिले, सदर पत्रात “तुम्ही प्रतिवर्षी बारा लाख रुपये ‘खंडणी’ बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहरास पुनः लुटीची भीती उरणार नाही!” असा उल्लेख करण्यात आलेला आहे”, असं स्पष्टीकरण शरद पवार गटाकडून देण्यात आलं.

“आणखी एक बाब अशी की, ‘खंडणी’ या शब्दाचा अर्थ हा आजच्या काळाप्रमाणे त्यावेळी गैरकृत्य असा नव्हता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ‘खंडणी’ शब्दावरून आरोप करण्याऐवजी अगोदर शिवछत्रपतींचा इतिहास समजून घ्यायला हवा. आणि हो, ज्यांच्या मनातच ‘शिवद्रोह’ आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुठून कळणार म्हणा…”, असं प्रत्युत्तर शरद पवार गटाकडून देण्यात आलं आहे.