पडद्यामागे जोरदार हालचाली, रात्री उशिरा ‘वर्षा’वर 3 तास खल, शिंदे आणि अजित पवार यांच्यात काय ठरलं?

| Updated on: Sep 12, 2024 | 9:15 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नुकतीच बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पडद्यामागे जोरदार हालचाली, रात्री उशिरा वर्षावर 3 तास खल, शिंदे आणि अजित पवार यांच्यात काय ठरलं?
एकनाथ शिंदे आणि अजित पवार
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत कोणता पक्ष किती जागा लढवणार? याकडे राज्याचं लक्ष आहे. महायुतीत प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या जागांचा दावा केला जातोय. शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून याआधीच उघडपणे किती जागा हव्या याबाबत इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेला 100 जागा लढवायच्या आहेत तर राष्ट्रवादीला 80 जागा लढवायच्या आहेत. दुसरीकडे भाजप पक्ष 125 जागांची तयारी करत आहे. असं असताना कोणत्या पक्षाला किती जागा मिळाणार, महायुतीचा जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? याकडे राज्याचं लक्ष आहे. राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक घोषित होऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीसाठी महायुतीत चांगलेच खलबतं सुरु आहे. विशेष म्हणजे नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बुधवारी मध्यरात्री 3 तास बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलेला फॉर्म्युला अंमलात कसा आणायचा? या विषयावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे

दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी चर्चा काय?

आगामी निवडणुकांवर येणाऱ्या सर्व्हेंवर कोणतीही काळजी घ्यायला हवी, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ज्या जागांवर हमखास जिंकून येणार अशा जागांचं लवकर वाटप व्हावं, अशी देखील चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली. विशेष म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट आमनेसामने येऊ शकणाऱ्या जागांवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी बनवलेल्या अहवालावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला शिवसेना मंत्री दादा भुसे आणि मंत्री उदय सामंत यांचीदेखील उपस्थिती होती.

महायुतीचा लोकसभा निवडणुकीसारखी चूक टाळण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नव्हता. त्यामुळे महायुतीच्या तीनही पक्षांना त्याचा मोठा फटका बसलेला बघायला मिळाला. तसा फटका पुन्हा बसू नये यासाठी आता महायुती कामाला लागली आहे. महायुतीकडून राज्यातील सर्व 288 जागांचा आढावा घेतला जातोय. तसेच तातडीने जागावाटप निश्चित करुन कामाला लागण्याचा महायुतीचा निर्धार आहे.