मुंबईसह कोकणात ऑरेंज अर्लट; मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबईकरांनो गरजेशिवाय…”

| Updated on: Jul 08, 2024 | 2:53 PM

"सध्या कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील ज्या रस्त्यांवर सकाळी पाणी साचले होते, त्या रस्त्यांवरी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. रेल्वेही सुरु झाली आहे", अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबईसह कोकणात ऑरेंज अर्लट; मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईकरांनो गरजेशिवाय...
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Follow us on

CM Eknath Shinde Appeal To Citizen : मुंबईत काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पावसाबद्दल झालेल्या उपाययोजनांबद्दलची सविस्तर माहिती दिली.

नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये

“राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये”, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

मुंबईत अतिवृष्टीसारखीच परिस्थिती

“मुंबईत २६७ ते ३०० मिमी इतका पाऊस झाला आहे. जर ६५ मिमीच्या वर पाऊस झाला तर मुंबईत अतिवृष्टीसारखीच परिस्थिती निर्माण होते. त्यात मुंबईत ३०० मिमी इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही रेल्वेच्या रुळांवर पाणी आलं. चुनाभट्टी सायन या ठिकाणीही पाणी साचलं. यामुळे रेल्वे सेवाही ठप्प झाली. परंतु रेल्वे, पालिका आणि राज्य सरकार या सर्वांनी मिळून काम केले आहे”, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

“रेल्वेचे २०० पंप सुरु आहे. मुंबई महापालिकेचे ४८१ पंप सुरु आहेत. हे पंप पाण्याचा निचरा करण्याचे काम करत आहेत. हिंदमाता, गांधी मार्केट, मिलन सबवे या ठिकाणी पाणी साचलं नाही. कारण याठिकाणी असलेल्या पंपाने तातडीने काम केले. होल्डिंग पाँडचाही मोठा फायदा झाला आहे. तसेच रेल्वेच्या खाली मायक्रो टनलिंग केलेल्याचाही खूप मोठा फायदा होत आहे. देशात पहिल्यांदाच होल्डिंग पाँड आणि मायक्रो टनलिंगसारखी सुविधा मुंबईत उपलब्ध आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट

“मी सकाळपासूनच सर्व यंत्रणांच्या संपर्कात होतो. यात कोणत्या ट्रेन्स थांबलेल्या आहेत, याबद्द्लचीही माहिती घेत होतो. मध्य रेल्वे सुरु झाली आहे. तसेच हार्बर रेल्वेही सुरु आहे. आता पाण्याचा निचरा झाल्याने रेल्वे सेवाही सुरळीत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बीएसटी आणि एसटीलाही सूचना केल्या होत्या. ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी सेवा द्या, अशी सूचना केली होती. सध्या कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, जळगाव या ठिकाणीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील ज्या रस्त्यांवर सकाळी पाणी साचले होते, त्या रस्त्यांवरी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. रेल्वेही सुरु झाली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती, पण ती देखील पू्र्ववत करण्यात आली आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“आज मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे आता मोगरा पंपिंग स्टेशन, माहुल पंपिंग स्टेशन करत आहोत. तसेच मिठी नदी आणि पोयसर नदी या दोन नद्यांची कॅरिंग कॅपिसिटी वाढवत आहोत. तसेच मिठी नदीला पंप गेट आणि फ्लड गेटं बसवले जाणार आहेत. त्यामुळे समुद्राचे पाणी पुन्हा शहरात येणार नाही. त्या उलट मुंबईत हायटाईड असताना साचलेले पाणी बाहेर टाकले जाईल”, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.