सरकारने शेतकऱ्यांसाठी काय-काय योजना सुरु केल्या? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वाचली संपूर्ण यादी

| Updated on: Mar 01, 2024 | 4:52 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सरकारकडून शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजना लागू करण्यात आल्या, किती रुपये रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आली, याबाबत माहिती दिली.

सरकारने शेतकऱ्यांसाठी काय-काय योजना सुरु केल्या? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वाचली संपूर्ण यादी
Follow us on

मुंबई | 1 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सरकारकडून शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजना लागू करण्यात आल्या, किती रुपये रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आली, याबाबत माहिती दिली. “शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला अन्न मिळतं हे आपण मान्य केलं पाहिजे. सरकार म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी योजना लागू केल्या आहेत. केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत 16 हफ्त्यांमध्ये 29,520 कोटी रुपये बँकेत जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून वर्षाला 12 हजार रुपये मिळतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या हफ्त्यापोटी 1720 कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्यापोटी 3800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली. यातून 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. एकूण 5520 कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यावर जमा केले”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

“तुम्ही तपास करा. एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो. खोटं बोलत नाही. दिलेला शब्द पाळतो हे तुम्ही पाहिलं आहे. या योजनेअंतर्गत 35000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारने 1 रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचायचे असं दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्हटलं होतं. पण आता लाभार्थ्यांपर्यंत पूर्ण 1 रुपया जातो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “तुमचं सरकार असतं तर 35 हजार कोटी रुपये आले असते तर 30 हजार कोटी रुपये हडप झाले असते. फक्त 5 हजार कोटी पदरात पडले असते”, अशी टीका शिंदेंनी विरोधकांवर केली. पण आता आमचं सरकार आहे. डबल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारकडून बळीराजाला विक्रमी मदत

“अवकाळी पाऊस, गारपीट अशा आसमानी संकटामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या पावणे दोन वर्षात 15212 कोटी रुपये मदत सरकारने दिली आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या 30 हजार कोटी खर्चांच्या योजनेला चालना दिली”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. “अडीच घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या सरकारने राज्यातले सर्व सिंचन प्रकल्प बंद पाडले होते. पण आम्ही 121 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. 99103 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

‘समुद्रात वाहून जाणाऱ्या 65 टीएमसी पाण्याचा आम्ही विचार केलाय’

“वशिष्ट नदीमधून समुद्रात वाहून जाणाऱ्या 65 टीएमसी पाण्याचा आम्ही विचार केलाय. त्यावर आम्ही काल चर्चा केली. कोकणात असलेला बॅकलॉक काढण्यासाठी काम सुरु केलं. आमचे रामदास कदम मंत्री होते तेव्हापासून ते प्रयत्नशील होते. छोटे-मोठे, मध्यम बंधारे बांधून कोकणाला समृ्ध करण्याचं काम करतोय. मराठवाडा वाटर ग्रीड महाविकास आघाडीने बासनात गुंडाळला. तो आम्ही सुरु केला. सरकार शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देतोय. हे कुठलं राज्य देतंय? सांगा. त्यामुळे 2 कोटी 80 लाख एकर जमीन संरक्षित होतेय. नुकसान झालेल्या 64 लाख 21 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 49 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली. त्यापैकी 55 लाख 21 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2641 कोटी थेट जमा झाले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘1600 कोटी रुपये बोनस प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला’

“हेक्टरी 40 हजार रुपये मदत देण्याचा प्रयत्न सुरु आहे. 1600 कोटी रुपये बोनस प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दिले आहेत. महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेते 5190 कोटी रुपयांचे वितरण झालं आहे. या योजनेते 99.5 टक्के काम पूर्ण झालंय, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्याला प्रती लीटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला”, असंही त्यांनी सांगितलं.

“राज्यातील 9 जिल्ह्यात काल, परवा गारपीट झाली. त्यामुळे पीकं बाधित झाली. त्याचे पंचनामे सुरु आहेत. त्यांना सरकारच्या सुधारित निकषांप्रमाणे भरपाई दिली जाईल. महाराष्ट्रात कमी पाऊस झाला याची जाणीव आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.