विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे. राज्यातील 4 मोठ्या पक्षांनी आपापल्या पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. या सर्व आमदारांची मुक्काची व्यवस्था सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या 4 पक्षांनी आपले आमदार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या आमदारांना कोणत्याही हॉटेलमध्ये एकत्र ठेवलेलं नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपले आमदार क्रॉस व्होटींग करणार नाहीत, याची खात्री असेल, अशी चर्चा होती. पण काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पक्षाचे 4 मते फुटण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. असं असलं तरीही आपल्या पक्षाकडे पुरेसं संख्याबळ असल्याने आपल्या पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव या जिंकून येतील, असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.
“विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहिती आहे की, आमचे तीन-चार लोकं हे फुटणार आहेत. त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहे. आम्हाला माहिती आहे की, आमच्या उमेदवाराला कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. महाविकास आघाडीबद्दल आज ठरवणार आहोत. आमचे जे दोन-तीन लोकं आहेत, कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. तर एक नांदेडवाला आहे. या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. आम्हाला जे चार दिसत आहेत त्यांचे कान कसे टोचायचे ते आज रात्री ठरणार आहे आणि सर्व रणनीती आखणार आहोत”, अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिली.
“जसं आमच्याकडे नाराजी आहे तसं सत्ताधारी पक्षांमध्येदेखील नाराजी आहे. तसं नसतं तर त्यांनी हॉटेल पॉलिटिक्स केलं नसतं. दोन्ही पक्ष हॉटेल पॉलिटिक्स का करतात? कारण दोन्ही आमदार फुटू नये”, असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला. “उद्या सकाळी लाईन लागल्यानंतर माहिती पडेल. उद्या फेस रिडींग करून सांगणार कोण काँग्रेसला मतदान करणार आणि कोण फुटणार”, असंदेखील वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं.
“येणारा दिवस काँग्रेसचा आहे. आम्ही शंभर टक्के निवडून येणार आहोत. काँग्रेस काय होती आणि काय झाली ते तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसमध्ये लोकं तिकीट मागायला येत नव्हते. पण आता ताकदवान झाली आहे. त्यावेळला तुफान कर रहा था मेरे अज्म का ख्वाब, की दुनिया समझ रही थी मेरी कश्ती डूब गई. म्हणजे लोकांना वाटत होतं की, काँग्रेस संपली आहे. पण काँग्रेसच्या आजूबाजूला जे सागर होते ते प्रेमाने फिरत होते आणि नतमस्तक होते. आमच्याकडे आता लाईन लागली आहे”, असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला.