काँग्रेस आमदार धावत-धावत फडणवीसांच्या भेटीला, देवेंद्र म्हणाले, थांब तुझाही मुहूर्त लवकरच

| Updated on: Mar 01, 2024 | 8:57 PM

विधान भवन परिसरात काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस "विश्वजीत थांब तुझा मुहूर्त लावतो लवकरच", असं म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजीत कदम यांच्या पाठीवर हातही ठेवला. तसेच फडणवीसांनी विश्वजीत कदम यांच्याशी चर्चाही केली.

काँग्रेस आमदार धावत-धावत फडणवीसांच्या भेटीला, देवेंद्र म्हणाले, थांब तुझाही मुहूर्त लवकरच
Follow us on

निवृत्ती बाबर, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 1 मार्च 2024 : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद सभागृहातून बाहेर पडले. ते विधान भवनाच्या बाहेर जात होते. यावेळी विधान भवन परिसरात काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे देवेंद्र फडणवीस यांना शोधत धावत येताना दिसले. ते देवेंद्र फडणवीस यांना पाठून आवाज देत होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना समजलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी बातचित करायला सुरुवात केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला महत्त्वाचं वक्तव्य केलं. विश्वजीत थांब तुझा सु्द्धा लवकरच मुहूर्त लावतो, असं फडणवीस म्हणाले. विश्वजीत कदम आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली. दोन्ही नेते आणि त्यांच्यासोबत इतर नेते यावेळी विधान भवनाच्या बाहेर पडले.

विश्वजीत कदम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विधान भवनातील अशाप्रकारच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला तेव्हा विश्वजीत कदम यांनीसुद्धा राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली होती. अखेर या चर्चांवर स्वत: विश्वजीत कदम यांनी व्हिडीओ जारी करत आपण राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर त्यांची आज फडणवीसांना भेटतानाची देहबोली काहीतरी वेगळं सूचित करु पाहत तर नव्हती ना? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

फडणवीस आणि विश्वजीत कदम यांच्या भेटीचा व्हिडीओ पाहा

विश्वजीत कदम त्यावेळी काय म्हणाले होते?

“अशोक चव्हाण यांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. याच बातमीवरुन काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला निश्चितच वेदना झालेल्या आहेत. पण या बातमीबरोबरच चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की, मी सु्द्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी आजही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. ज्या कडेगाव-पलूसच्या जनतेने दिवंगत नेते पतंगराव कदम यांना भरभरुन प्रेम आणि साथ दिली. त्याच पलूस-कडेगावच्या नागरिकांनी मलाही सेवा करण्याची संधी दिली. म्हणून माझ्या पलूस-कडेगांवच्या बंधू-बघिणींना विश्वासात न घेता मी कुठलंही पाऊल टाकणार नाही. माझी नम्र विनंती आहे की कोणताही गैरसमज पसरवू नये”, असं विश्वजीत कदम म्हणाले होते.