खातेवाटपाची 10 वैशिष्ठ्ये
Image Credit source: Twitter
मुंबई- एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाट जाहीर झाले आहे. यात सर्वाधिक खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असली तरी संपूर्ण खातेवाटपाच्या यादीवर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा वरचष्मा दिसतो आहे. महाविकास आघाडीच्या काळात राष्ट्रवादीकडे असलेली महत्त्वाची खाती एकट्या देवेंद्र फडणवीसांकडे आलेली आहेत. त्यात गृह, अर्थ, जलसंपदा या मंत्र्यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर काँग्रेसकडे असलेले उर्जामंत्रीपदही फडणवीसांकडे गेलेले आहे. तसेच फडणवीस यांचे नीकटवर्तीय असलेले गिरीश महाजन, काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण यांना महत्त्वाची खाती मिळालेली आहेत. तर चंद्रकांत दादा पाटील आणि सुधार मुनगंटीवार या ज्येष्ठ मंत्र्यांना तुलनते कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. तर शिंदे गटातही अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या पारड्यात चांगली खाती गेली आहेत. एकूण या मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या यादीची वैशिष्ठ्ये जाणून घेऊयात.
- संपूर्ण मंत्रिमंडळ स्थापनेपासून ते विस्तारापर्यंत आणि आता खातेवाटपावरही देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा असल्याचे दिसते आहे. देवेंद्र फडणवीस यांना या खातेवाटपात सर्वाधित पॉवरफुल खाती मिळाली आहेत. त्यात गृह, अर्थ, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत.
- मविआ सरकारच्या काळात राष्ट्रवादीकडे असलेली महत्त्वाी खाती एकट्या फडणवीसांकडे गेली आहेत, तर इतर महत्त्वाची खाती भाजपाकडे गेलेली दिसतायेत. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेले गृह आणि जयंत पाटील यांच्याकडे असलेले जलसंपदा खाते एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलेले आहे. तसेच काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्याकडे असलेले उर्जा खातेही फडणवीस यांच्याकडेच असणार आहे.
- देवेंद्र फडणवीस यांच्या नीकटवर्तीयांनाही चांगली खाती मिळाली आहेत. गिरीश महाजन यांच्याकडे फडणवीस यांच्या खालोखाल चांगली खाती आहेत. त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती देण्यात आली आहेत. ग्रामविकासाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात चांगले काम उभे करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला असण्याची शक्यता आहे. तर अतुल सावे यांच्याकडे सहकार आणि ओबीसी मंत्रालय खाते देण्यात आले आहे. ही दोन्ही खाती अत्यंत महत्त्वाची आहेत.
- काँग्रेसमधून विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपात आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे फडणवीस यांनी चांगली जबाबदारी दिलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूलसारखे महत्त्वाचे पद देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास हे खातेही त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
- भाजपातील वरिष्ठ नेते असलेले सुधीर मुनगंटीवार आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना तुलनेने कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन खात, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य खाते देण्यात आले आहे. तर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यपद गेल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य ही खाती देण्यात आली आहेत.
- इतर ज्येष्ठांच्या तुलनेत भाजपाच्या अतुल सावे, रवींद्र चव्हाण यांना चांगली खाती मिळाली आहेत. अतुल सावे यांच्याकडे सहकार आणि ओबीसी मंत्रालय तर रवींद्र चव्हाम यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि भुजबळांकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार असणार आहे.
- एकनाथ शिंदे गटात अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या पदरात चांगली खाती पडली आहेत. सत्तार यांना राज्याचे कृषीमंत्रीपद देण्यात आले आहे. घोटाळ्याचे आरोप असतानाही त्यांना मंत्रिमंडळात मिळालेले स्थान आणि त्यांनतर त्यांना मिळालेले खाते हे महत्त्वाचे मानले जात आहे. तर तानाजी सावंत यांनाही आरोग्यासराखे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. आरोग्य हा विषय मुख्यमंत्र्यांच्याही जिव्हाळ्याचा मानण्यात येतोय.
- एकनाथ शिंदे यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे नगरविकास खाते आहे. त्याचबरोबर परविहन, पणन, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक ही खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वताकडे ठेवलेली आहेत. त्यांचे वाटप या खातेवाटपात करण्यात आलेले नाही. विस्तारात ही खाती शिंदे गटातील इतर महत्त्वाच्या नेत्यांकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तूर्तास शिंदे गटाच्या मंत्र्यांना अपवाद वगळता कमी महत्त्वाची खाती दिल्याचे मानण्यात येते आहे.
- दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा ही मंत्रिपदे तर शंभूराजे देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क मंत्रीपद देण्यात आले आहे. संजय राठोड यांनाही अन्न व औषध प्रशासन मिळाले आहे. अपेक्षेप्रमाणे गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा खाते दिले असले तरी दादा भुसे यांच्याकडे मात्र बंदरे आणि खनीकर्म खाते देण्यात आलेले आहे.
- एकनाथ शिंदे गटाने केलेले बंड, शिवसेनेला पाडेलेले खिंडार हे सगळे पाहता, याच पदासांठी इतक्या बंडखोर आमदारांनी सर्वस्व पणाला लावले होते का. असा प्रश्न मात्र निर्माण झालेला आहे.