मुंबईत भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना भिडले, जोरदार शाब्दिक चकमक, नेमकं कारण काय?

| Updated on: Dec 01, 2023 | 5:42 PM

मुंबईत भाजप आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही शाब्दिक चकमक एका बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या बीएमसीत ओपन स्पेस पॉलिसीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला.

मुंबईत भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना भिडले, जोरदार शाब्दिक चकमक, नेमकं कारण काय?
Follow us on

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 1 डिसेंबर 2023 : मुंबईत भाजप आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांमुळे चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री मंगलप्रभात लोढे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आलेली. या बैठकीत आपल्याला बोलू दिलं जात नाही, भूमिका मांडू दिली जात नाही, असा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली. हा वाद शिगेला पोहोचला. त्यानंतर काँग्रेसचे माजी नगरसेवक बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल केला.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आलेली. मुंबईच्या बीएमसीत ओपन स्पेस पॉलिसीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल हे गैरहजर होते. या बैठकीत आम्हाला बोलू दिले नाही, असा आरोप करत काँग्रेसचे माजी नगरसेवक बाहेर पडले. यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला.

काँग्रेस नेत्यांचा नेमका आरोप काय?

काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर चांगलाच हल्लाबोल केला. चर्चेत आमचे मुद्दे मांडायला वेळ दिला नाही. आमचे मुद्दे ऐकून घेतले नाही. आम्हाला बोलू दिले नाही, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. भाजपच्या नगसेवकांना झुकतं माप दिले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या बैठकीबाबत काँग्रेस माजी नगरसेवकांना कोणतीच माहिती दिली नसल्याचादेखील आरोप करण्यात आला. मंत्री पॉलिसी बनवायला बैठक कशी घेऊ शकतात? एका पक्षाचे आमदार महापालिकेची पॉलिसी बनवाणार का? असे सवाल काँग्रेस नेत्यांनी केला.