आधी रोहित पवार यांना समन्स, आता किशोरी पेडणेकर यांनाही ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Jan 19, 2024 | 5:26 PM

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहेत.

आधी रोहित पवार यांना समन्स, आता किशोरी पेडणेकर यांनाही ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Follow us on

मुंबई | 19 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती ताजी असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहेत. ईडीने किशोरी पेडणेकर यांना येत्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. किशोरी पेडणेकर यांना याआधीदेखील ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. दरम्यान, “माझ्या हाती ईडीचं समन्स येईल तेव्हा मी प्रतिक्रिया देईन”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी देखील तपास केला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास सुरु असतानाच ईडीनेदेखील या प्रकरणाची दखल घेत समांतर तपासाला सुरुवात केली. ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. किशोरी पेडणेकर यांना याआधीदेखील समन्स बजावण्यात आलं होतं. त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ईडीने समन्स बजावलं आहे.

‘ईडीला ते दिसत नाही’, अंबादास दानवे यांची टीका

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीची आता ही रोजची कारवाई झाली आहे. ईडीने आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी जावून तपास केला, ईडीला जे पंतप्रधान देशाच्या 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत बोलले होते ते दिसत नाही. ईडीने सुरज चव्हाण यांना ज्या प्रकरणावर अटक केली त्याचा कुठेच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे अशा पद्धतीने ईडीची भीती आणि ईडीचा वापर करुन विरोधकांचा नामहरण्याचा प्रयत्न केला जातोय”, असा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

“न्यूटनचा नियम आहे, जेवढा चेंडू जमिनीवर जोरात आपटणार तेवढाच चो उंच जाणार. त्यामुळे आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना जेवढा त्रास दिला जाईल, तितक्याच ताकदीने महाविकास आघाडी राजकीय दृष्ट्या यांचा मुकाबला केला जाईल”, असं अंबादास दानवे म्हणाले. “ईडी कारवाईचा वापर करुन ब्लॅकमेलिंग केले जात आहे. पण शिवसैनिक अशा कारवाईमधून झुकणार नाहीत”, असं दानवे म्हणाले.