वरळीत पत नाही उरली, आता भेंडीबाजारातून लढणार?; एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला

| Updated on: Jun 19, 2024 | 9:51 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ठाकरे गटावर सडकून टीका केली. मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या ठिकाणीच ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळाली, असा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

वरळीत पत नाही उरली, आता भेंडीबाजारातून लढणार?; एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे
Follow us on

शिवसेना पक्षाच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून वरळी डोम येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर घणाघात केला. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणि ठाकरे गटाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवरुन निशाणा साधला. विशेष म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ हा आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. पण या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला केवळ साडेसहा हजारांचं लीड मिळालं. त्यामुळे आता आदित्य ठाकरे भेंडीबाजारातून लढणार का? अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता केली.

“वरळीत तुम्हाला कमी मतदान मिळालं. जेमतेम सहा हजाराची लीड. 50 हजाराचं लीड मिळणार असा दावा करत होता. आता कसे लढणार? तुम्हाला भेंडीबाजारत लढावं लागणार. मतदारसंघात नाही पत, माझं नाव गणपत. अशी अवस्था झालीय आहे”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला. “हिंदूच हिंदूचे शत्रू ठरतात हे बाळासाहेब म्हणाले होते. यापुढे असं घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वेळीच सावध राहा. अल्पसंख्याकाच्या विरोधात बाळासाहेब कधीच नव्हते. आम्ही नव्हतो. कधीच नव्हतो. कितीतरी कार्यकर्ते आपले अल्पसंख्याक समाजाचे आहेत. बाळासाहेबांचा विरोध होता वोट बँकेच्या घाणेरड्या राजकारणाराला त्यांचा विरोध होता”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘याकूब मेमनचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये’

“याकूब मेमनचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये फिरत होते. मतांसाठी तुम्ही कसाबला डोक्यावर घेतलं. करकरे, कामटे हे शहीद झाले की नाही यावर शंका उपस्थित करता. ओंबळेंनी कसाबला एके ४७ सकट पकडलं. गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडलं नाही, त्यांच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह व्यक्त करत आहात. कुठे फेडणार हे पाप. औरंगजेबाची वाहवा करणाऱ्यांच्या बाजूला बसता. लाज वाटत नाही. जनाची नाही तरी मनाची तरी वाटू द्या. मते मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले सर्वांना माहीत आहे. ओवैसी पेक्षा उबाठा आपला मसिहा वाटू लागलाय”, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.

‘मुंबईत तुमच्या पेक्षा सव्वा दोन लाख जास्त मते आम्हाला मिळाली’

“ईव्हीएमचा घोटाळा केला असता तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळेही जिंकले असते. वायकरांचा विजय हा जनतेचा विजय आहे. मेरिटवर झालेला विजय आहे. वायकरांच्या ठिकाणी जर ईव्हीएम हॅक होते, मग तुमचा विजय झाला ती ईव्हीएम चांगली का?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. “उबाठा हा खोटारडा पक्ष आहे. खोटं बोला आणि रडा. रडेगण असं नाव त्यांना दिलं पाहिजे. सारखा रडीचा डाव. जिंकलो जिंकलो ढोल पिटताय. पण कुणाच्या जीवावर. शिवसेनेचा मतदार तुमच्यासोबत राहिला का विचार करा. मुंबईत तुमच्या पेक्षा सव्वा दोन लाख जास्त मते आम्हाला मिळाली”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.