मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा, पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल – राऊत

| Updated on: Sep 21, 2024 | 3:33 PM

विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस उरले असताना महाविकासआघाडीत बैठकांचा सिलसिला वाढला आहे. विधानसभेसाठी जास्त जागा असल्याने चर्चेसाठी वेळ लागतो. लवकरच यादी जाहीर केली जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत ही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा, पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल - राऊत
संजय राऊत, खासदार
Follow us on

विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी टक्कर होणार आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांचा समावेश आहे तर महाविकासआघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना यूबीटी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा समावेश आहे. जागा वाटपावरुन महाविकासआघाडीत बैठका सुरु आहेत. २८८ जागांवर चर्चा सुरु आहे. शिवसेना यूबीटी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी लवकरच जागावाटप पूर्ण होतील आणि त्या जाहीर केल्या जातील असं म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाविकासआघाडीच्या बैठका सुरु आहेत. लोकसभेत जागा कमी होत्या. त्यामुळे फार वेळ लागला नाही, पण विधानसभेत २८८ जागा आहेत. तीन पक्षात वाटायच्या असतात त्यासाठी वेळ लागतो, प्रत्येक जागेची चर्चा होते. लोकसभेत इच्छूक फार कमी असतात. ४८ जागांसाठी उमेदवार बरेच ठरलेले असतात. सीटींग उमेदवार असतात. विधानसभेला तसे होत नाही. त्यामुळे जास्त वेळ लागतो.

विधानसभेचा फॉर्म्युला काय?

तेव्हा ही कोणताही फॉर्म्युला नव्हता. आताही कोणता फॉर्म्युला नाही. फॉर्म्युला घेऊन आघाडी होत नाही. कोणताही फॉर्म्युला घेऊन आघाडी तयार होत नाही. तिघांनी एकत्र येऊन भ्रष्ट आणि दरोडेखोरांचं सरकार दूर करायचं आहे हाच आमचा फॉर्म्युला आहे.

मोठा भाऊ कोण?

प्रत्यक्षात तसं नाही. कोणी किती जागा लढाव्या हे आमचं ठरलंच नाहीये. कोण कोणती जागा जिंकू शकेल आणि जिंकण्याची शक्यता आहे हे आम्ही ठरवत आहे. विधानसभेत असं होत नाही. जिंकण्याच्या क्षमतेचा उमेदवार कोण देऊ शकतो त्यावर उमेदवार ठरतो. महाविकासाआघाडीत कोणत्याही जागेवर मतभेद नाही. आम्ही सगळे एकत्र येऊन सुरळीत चर्चा करत आहोत.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. चेहरा असेल तर उत्तम. मतांची टक्केवारी यामुळे वाढवता येते. लोकं पक्षाबरोबर चेहऱ्याला ही मतदान करतात. भाजपमध्ये कोणताही चेहरा नाही. जे आहेत ते उधारीचे आहेत. काही लोकांनी मोदींना मतदान केलंय. हा फरक असतो पक्ष आणि चेहऱ्याचा. मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा असते. पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल. घटकपक्षांवर ही चर्चा होईल. ते आमचे सहकारी आहेत. लोकसभेत त्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे.