आम्हाला विकासाचा छंद, त्यांना विकास कामे रोखण्याचा, धारावी प्रकल्पावरुन फडणवीसांची ठाकरेंवर टीका

| Updated on: Oct 28, 2024 | 9:02 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धारावी प्रकल्पावरुन जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, धारावीचा प्रोजेक्ट त्यांचं सरकार आलं तर नक्कीच ते रोखतील यात काही शंका नाही. कारण त्यांचं विकासाची कामं रोखण्याचा छंद आहे.

आम्हाला विकासाचा छंद, त्यांना विकास कामे रोखण्याचा, धारावी प्रकल्पावरुन फडणवीसांची ठाकरेंवर टीका
fadnavis
Follow us on

टीव्ही ९ च्या सत्ता संमेलन या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना विकास कामे रोखण्याचा छंद असल्याचा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले की, ते सत्तेत असते तर त्यांना याबाबत कोणताही आक्षेप नसता. पण आता ते सत्तेत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. धारावीच्या गरीब लोकांना आम्ही घरे देणार असं ही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, ‘त्यांचं सरकार येणार नाही. पण ही गोष्ट पक्की आहे. त्यांचे सरकार आले तर धारावीचा प्रकल्प रद्द करतील याबाबत काही शंका नाही. कारण त्यांचं सरकार आलं तेव्हा कोस्टल रोडपासून अनेक गोष्टी त्यांनी रोखल्या. प्रत्येकाला एक छंद आहे. आम्हाला विकासाचा छंद आहे. तर त्यांना विकास कामे रोखण्याचा छंद आहे. धारावी अदानीला गेली नाही. डीआरपीला प्रकल्प गेला आहे. डीआरपीमध्ये महाराष्ट्र सरकारची भागिदारी आहे. ही प्रायव्हेट कंपनी नाही.’

‘धारावीच्या टेंडरच्या अटी ठाकरे सरकारने टाकल्या आहेत. त्यांनी टीडीआरवर कॅप ठेवली नव्हती. आम्ही टीडीआरमध्ये कॅपिंग केली. टीडीआर डीजिटल प्लॅटफॉर्मवर ठेवलं आहे. यांना धारावीच्या लोकांना घर द्यायचं नाही. त्यांना लोकांना नरक यातना द्यायच्या आहेत. आपली पोळी भाजायची आहे. पण आम्ही गरीबांना घर देणार. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार आहोत.’

तर त्यांनीच अदाणीचं गुणगाण गायलं असतं

‘आजही धारावीतील लोकांचं समर्थन आणि सपोर्ट या प्रकल्पाला आहे. त्यांचं सरकार आलं असतं तर त्यांना अदानीचं गुणगाण गायलं असतं. ही उद्धव ठाकरे यांची सवय आहे. देशातील सर्वात मोठी रिफायनरी येणार होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला, ती रोखली. जेव्हा स्वत: सत्तेत आले तेव्हा केंद्र सरकारला पत्र लिहिलं की रिफायनरी करा. ही त्यांची सवय आहे. ते सरकारमध्ये असते आणि अदानीकडे प्रकल्प गेला असता तर त्यांना काही अडचण झाली नसती. त्यांच्या काळात काही अदानी नव्हते का. आम्हाला काय अदानी असो की कोणी असो जे लोक यशस्वी बीडर आहे. त्यांना काम मिळाले. असं ही फडणवीस म्हणाले.

माझी उपयोगिता जिथे असेल तिथे पार्टी नेईल, जे काम देईल ते करेन. माझा इतिहास काढा. जो रोल मला दिला त्यात मी झोकून दिलं. दिल्ली, मुंबई, नागपूर मी झोकून काम केलं. नवीन सरकार बनवण्याच्यावेळी उद्धव ठाकरे यांना खुर्ची खुणावत होती. तेव्हा राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आला. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागत होते ते पाहून आम्ही शरद पवारांशी चर्चा केली. सर्व निर्णय घेतले. शपथ घेऊ अशी परिस्थिती आली. तेव्हा शरद पवार मागे हटले. त्यांनी निर्णय बदलला. अजित पवार आमच्यासोबत आले. आणि ७२ तास आमचं सरकार झालं.