Special Report : राज्यपाल अमित शाहांना पत्र पाठवत म्हणतात, ‘पुढं काय सांगा!’

| Updated on: Dec 12, 2022 | 10:55 PM

शिवरायांवरील वक्तव्यावरुन, महाविकास आघाडी आणि खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा आक्रमक झाले असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिलंय.

Special Report : राज्यपाल अमित शाहांना पत्र पाठवत म्हणतात, पुढं काय सांगा!
Follow us on

मुंबई : राज्यपालांना हटवण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक आहेत. महाविकास आघाडीनं तर मुंबईत मोर्चाची घोषणाही केली. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिलंय. शिवरायांचा अपमान केलेला नाही. पण तरीही अशा परिस्थिती पुढे काय करावं यासंदर्भात मार्गदर्शन करा, असं खुद्द राज्यपालांनी म्हटल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात. शिवरायांवरील वक्तव्यावरुन, महाविकास आघाडी आणि खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा आक्रमक झाले असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिलंय.

महाराजांचा अपमान करण्याची कल्पना स्वप्नातही येऊ शकत नाही. नवे आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान कसा असू शकतो ? असा सवाल राज्यपालांनी पत्रातून केलाय.

राज्यपालांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

हे सुद्धा वाचा

एका विद्यापीठात मी केलेल्या भाषणावरुन सध्या गदारोळ सुरुय. माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केलं. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विद्यार्थी आदर्श मानत.

हे सारे आदर्श आहेतच पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात.

आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो. याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. यात कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचेच नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर तात्काळ खेद व्यक्त करणे किंवा क्षमा मागण्यास मी कधीच संकोच करत नाही. महापुरुषांच्या अपमानाची कल्पना मी स्वप्नातही करु शकत नाही. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत काय करायचं त्यावर तुम्हीच मार्गदर्शन करा.

संजय राऊतांचा निशाणा

संजय राऊतांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनातील कार्यक्रमातून निशाणा साधलाय. या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारीही उपस्थित होते. महाराजांचा अपमान करणारे स्टेजवर होते, मग मुख्यमंत्री शिंदेंनी मोदींना जाब का विचारला नाही ? असा सवाल राऊतांनी शिंदेंना केला.

भाजपची भूमिका

राज्यपालांनी शिवरायांबद्दल जे वक्तव्य केलं, त्याचं भाजप नेत्यांनी समर्थन केलेलं नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यपालांची चूकच असल्याचं म्हटलंय. तर फडणवीसांनी योग्य ठिकाणी उदयनराजेंच्या भावना पोहोचवल्याचं म्हटलं.

गृहमंत्रालयाकडून चौकशी सुरु असतानाच राज्यपालांचं पत्र

उदयनराजेंनी राष्ट्रपतींनाही पत्र लिहिलं. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंनी हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवलं. गृहमंत्रालयाकडून राज्यपालांच्या वक्तव्याची चौकशी सुरु आहे. त्याचवेळी कोश्यारींनी पत्र लिहून महाराजांचा अपमान केला नसल्याचं म्हटलंय, मात्र त्याचवेळी त्यांनी मार्गदर्शन करा असं अमित शाहांना म्हटलंय.

महाविकास आघाडीचा महामोर्चा

राज्यपालांवर कारवाईसाठी विरोधकांनी दबाव वाढवलाय. आंदोलनांनंतर आता महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला मुंबईत मोर्चाही निघणार आहे. मात्र आता राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे आपली भूमिका मांडलीय. त्या पत्रातील शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे, मार्गदर्शन करा असं राज्यपाल म्हणालेत. त्यामुळं नेमकं काय होतंय? हे दिसेलच.