तो येतोय… कुणाचे बॅनर्स?, अचानक शेकडो बॅनर्स लागल्याने नवी मुंबईत चर्चांना उधाण

| Updated on: Sep 29, 2024 | 4:16 PM

Navi Mumbai Banners : सध्या राजकीय वातावरण विविध आंदोलनं, मोर्चांमुळे ढवळून निघालं आहे. येत्या विधानसभेत अनेक मतदारसंघात इच्छुकांचं मोठं पीक येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत अचानक शेकडो बॅनर्सनी चर्चेला उधाण आलं आहे.

तो येतोय... कुणाचे बॅनर्स?, अचानक शेकडो बॅनर्स लागल्याने नवी मुंबईत चर्चांना उधाण
नवी मुंबईत बॅनर्सने वेधले लक्ष
Follow us on

सध्या राजकारण हा इव्हेंटचा पण विषय ठरला आहे. राजकारणात चर्चेशिवाय मजा नाही, हे आता नवीन सूत्र समोर येत आहे. हवा केल्याशिवाय कोणी भाव देणार नाही, चर्चा होणार नाही या गोष्टी ओघाने आल्याच. त्यासाठी काही जण अनेक ट्रिक्स, आयडिया लढवतात. त्यातच सध्या विविध आंदोलनं, मोर्चे, उपोषण यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. आता नवी मुंबईत लागलेल्या बॅनर्संनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अचानक इतके बॅनर लागल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय घडामोड घडते आणि कुणाला धक्का बसतो याची खमंग चर्चा रंगली आहे.

तो येतोय.. बॅनरचा धुमाकूळ

तो येतोय.. अशा आशयाचे बॅनर सध्या नवी मुंबईच्या ऐरोली मधे झळकले आहेत. हे बॅनर नवी मुंबईकराचं लक्ष वेधून घेत आहेत. तो येतोय घराणेशाहीला सर्व सामन्यांची ताकद दाखवायला. तो येतोय माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करायला. तो येतोय नवी मुंबईकरांना टोल पासून मुक्ती द्यायला, असे आशय या बॅनरवर लिहला आहे. या बॅनरने नवी मुंबईत नुसता धुमाकूळ घातला आहे. हे बॅनर नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये झळकले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या भागातील राजकारण तापण्याची चर्चा जोर धरत आहे. कुणाला या माध्यमातून इशारा देण्यात येत आहे, कुणाला धक्का देण्यात येणार आहे, हे लवकरच समोर येईल.

हे सुद्धा वाचा

गणेश नाईक यांना आव्हान

या बॅनरच्या माध्यमातून भाजपा आमदार गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा जो प्रयत्न आहे, तो केला गेला आहे, अशी चर्चा रंगली आहे. तसंच हे बॅनर कोणी झळकवले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी नाईकांना या माध्यमातून आव्हान कुणीतरी देत आहे. विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीनेच हे बॅनर लावल्याचे समोर येत आहे. हे बॅनर कोणी लावले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी काही दिवसातच त्यावरुन पडदा उठणार आहे.

बॅनर लिहलंय काय?

मी येतोय, घराणे शाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी, मी येतोय पश्चिम महाराष्ट्रातील सुपुत्र आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी, मी येतोय टोल माफी मिळवून देण्यासाठी, मी येतोय महिला भगिनींच्या रक्षणासाठी अश्या विविध टॅग लाईन देत हे बॅनर लावण्यात आले असून प्रत्येकाची नजर या बॅनरवर खिळून राहत आहे.

नेमके कोण येतोय अशी चर्चा आता शहरातील सर्व भागात रंगलेली पहायला मिळत असून नवी मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली पहायला मिळतेय. यामुळे नवी मुंबईतील प्रस्थापित नेत्यांचे धाबे दणाणले आहे. नेमकं येतंय कोण याची उत्सुकता नवी मुंबईकरांमध्ये पहायला मिळत आहे.