मुंबईत BMC कडून हायअलर्ट जारी, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना

| Updated on: Sep 25, 2024 | 9:12 PM

BMC rain alert : मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या २-३ तासांपासून मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईत BMC कडून हायअलर्ट जारी, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
BMC rain alert
Follow us on

महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवार आणि गुरुवारी दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अलर्ट आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीच्या आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. IMD द्वारे जारी केलेल्या रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वॉर्डाच्या कार्यकारी अभियंत्याला वॉर्ड कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

पावसाबाबत आवश्यक सूचना

सर्व वॉर्डातील एका अधिकाऱ्यांला पुढील सर्व अपडेट्ससाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य अभियंता, स्ट्रॉम ड्रेनेज विभाग SWD कर्मचारी यांनी निर्जलीकरण पंप चालू आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी सांगण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य अभियंता झोन यांना आज रात्री आपापल्या परिमंडळात उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी आपापल्या भागात वैयक्तिकरित्या लक्ष ठेवतील आणि वॉर्ड आणि केंद्रीय एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर लक्ष ठेवतील.

गुरुवारी सकाळपर्यंत अलर्ट

IMD ने उद्या सकाळी 8.30 पर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने “25 आणि 26 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, 26 सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.” IMD ने आपल्या बुलेटिनमध्ये लिहिले आहे की, गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे आणि शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विमानं हैदराबादकडे वळवली

दिल्लीहून मुंबईला येणारी विमानं देखील हैदराबादकडे वळवण्यात आली आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय़ घेण्यात आला आहे. मुंबईत गेल्या २ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सध्याचं वातावरण पाहता विमानं हैदराबादकडे वळवण्यात आली आहेत.