टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज मुंबईत दाखल झाली. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत आज जंगी विजयी यात्रा काढण्यात आली. लाखो चाहते या विजयी यात्रेत सहभागी झाले. मुंबईच्या नरिमन पॉईंट पासून ते वानखेडे स्टेडियम अशी टीम इंडियाची विजयी यात्रा निघाली. टीम इंडियाचे खेळाडू ओपन रुफ बसमधून स्टेडियमच्या दिशेने गेले. यावेळी मरीन ड्राईव्ह परिसरात लाखो क्रिकेट चाहते जमलेले होते. या सर्व चाहत्यांनी मोठ्या उत्साहात, घोषणाबाजी करत टीम इंडियाच्या खेळाडूंचं स्वागत केलं. अनेक जण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात आवडत्या खेळाडूंचे फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसले. ही मिरवणूक जवळपास 2.2 किमीची होती. या दरम्यान मरीन ड्राईव्ह परिसरात उसळलेली गर्दी ही जवळपास 3 लाखापेक्षा जास्त होती, अशी माहिती आता समोर येत आहे.
मरीन ड्राईव्ह परिसरात आज दुपारपासून क्रिकेट प्रेमींची गर्दी जमायला सुरुवात झाली होती. आपल्या आवडत्या टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी इथे लाखो चाहते अनेक तासांपासून वाट पाहत उभे होते. यामध्ये तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. मरीन ड्राईव्ह परिसरात उसळलेली गर्दी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतर्क झाले. त्यांनी तातडीने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना फोन करत गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे तसेच गर्दीचं नियोजन करण्याचे आदेश दिले. एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना गर्दीत काळजी घेण्याचं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील तेच आवाहन मुंबईकरांना केलं.
या विजयी मिरवणुकीच्या दरम्यान काही संवेदनशील गोष्टी देखील बघायला मिळाल्या. मुंबईकरांच्या हळव्या आणि संवेदनशील मनाची प्रचिती या निमित्ताने आली. विजयी मिरवणूक सुरु होण्याआधी मरीन ड्राईव्ह परिसरात एक रुग्णावाहिका भर गर्दीतून जाताना दिसली. विशेष म्हणजे मुंगीलादेखील जायला जागा नाही इतका मोठा जनसागर तिथे लोटला होता. पण या जनसागराने रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करुन दिली. अवघ्या काही मिनिटात ही रुग्णवाहिका गर्दी पार करुन आपल्या मार्गाला गेली. गर्दीतल्या रुग्णवाहिकेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.