जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार?, भाजपने सांगितली 10 कारणे; ट्विट व्हायरल

| Updated on: Jun 25, 2023 | 11:10 AM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस का सोडणार याची कारणेही भाजपने दिली आहेत.

जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार?, भाजपने सांगितली 10 कारणे; ट्विट व्हायरल
jayant patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यास पक्षाला बळ मिळेल, असं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणताना दिसत आहेत. अजित पवार यांनीही आपल्याला पक्षात जबाबदारी देण्याचं सुतोवाच केलं होतं. त्यामुळे अजितदादांच्या समर्थकांनी ही मागणी लावून धरली आहे. एकीकडे अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद करण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच भाजपने नवाच दावा केला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडतील? याची दहा कारणेही भाजपने दिली आहेत.

TV9 Marathi Live | Rain Update | Shinde Vs Thackeray | Russia War | Maharashtra Politics | ED Raid

भाजपने ट्विट करत जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार? याची 10 कारणे दिली आहेत. त्यामुळे भाजपच्या या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे. तसेच भाजपचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. आता जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार की राष्ट्रवादीतच राहणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील हे रडले होते. त्यांचं हे रडणं हा एक ड्रामा होता. कारण त्यामागचं कारण काही वेगळच होतं. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आपलं होणार कसं? हे त्यामागचं खरं कारण होतं, असं भाजपने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच जयंत पाटील यांच्याकडे पक्ष सोडून जाण्याचे एक नाही दहा कारणे असल्याचंही ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

भाजपने सांगितलेली 10 कारणे

  1. शरद पवार यांनी 2019 नंतर जयंत पाटील यांना झुलवत ठेवलं. कधीकाळी गृहमंत्रीपद भूषविलेल्या जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद देण्याऐवजी जलसंधारण मंत्रीपद दिलं. ही जयंत पाटील यांची नाचक्की होती.
  2. राष्ट्रवादीत दोन गट आहेत. एक सुप्रिया सुळे यांचा आणि दुसरा अजित पवार यांचा. जयंत पाटील या दोन्ही गटाचे नाहीयेत. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादीतील भविष्य अंधारातच राहिलं.
  3. जयंत पाटील हे महत्त्वकांक्षी नेते आहेत. पण त्यांना आपण केवळ नामधारी प्रदेशाध्यक्ष असल्याचं वाटतंय. कारण सुप्रिया सुळे आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्या आहेत. तर राज्य स्तरावरील सर्व निर्णय अजित पवार घेत आहेत. त्यामुळे जयंत पाटील अस्वस्थ आहेत.
  4. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांची नजर आता प्रदेशाध्यक्षपदावर आहे. प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांकडे गेलं तर जयंत पाटील जाणार कुठे?
  5. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाऊ शकलं असतं. पण शरद पवार यांनी तसं केलं नाही.
  6. शरद पवार यांनी पक्षातील दोन्ही गटांना खूश केलं. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केलंय. तर प्रफुल्ल पटेल यांनाही कार्यकारी अध्यक्ष केलंय. प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या जवळचे आहेत. ही निवड करताना जयंत पाटील यांचा विचार झाला नाही.
  7. शरद पवार यांनी राजकारणातून पूर्णपणे निवृत्ती घेतली तर जयंत पाटील हे त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या हाताखाली कसे काम करतील?
  8. जयंत पाटील यांना आपला मुलगा प्रतिक पाटील याला राजकारणात आणायचं आहे. त्यासाठी त्यांना मुलाला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्षही केलं आहे. पण शरद पवार यांच्याकडून जयंत पाटील यांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये.
  9. शरद पवार यांनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडे कोणतीही संघटनात्मक जबाबदारी दिलेली नाही. मग जयंत पाटील यांच्या मुलाला काय मिळणार?
  10. त्यामुळेच जयंत पाटील यांना राष्ट्रवादीत आपलं आणि मुलाचं भवितव्य दिसत नाहीये. शरद पवार यांच्या राजीनामाच्या वेळी जयंत पाटील यांनी भलेही रडण्याचा ड्रामा केला असेल पण वास्तविक जयंत पाटील राष्ट्रवादीत वैतागले आहेत. त्यामुळेच ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात.