मुंबई | 26 डिसेंबर 2023 : शिरुर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांची पाहणी ते करणार आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील विकासकामांची पाहणी ते करणार आहेत. गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस काही दिवस पुण्यापर्यंत धावणार आहे. सांगली-मिराज दरम्यान दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 30 हजारांहून अधिक अपघात झाले असून त्यात बळी गेलेल्यांचीही संख्या मोठी आहे. अवकाळी पावसामुळे बाजार समितीत भाज्यांची आवक कमी झाली. यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास सर्वच भाज्या प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वधारल्या आहेत.राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
ठाणे | दिघा एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली आहे. महाराष्ट्र फ्लोअर मिल कंपनीला आग लागली. कंपनी अनेक वर्षांपासून बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीत चार मजली कंपनी पूर्णतः जळून खाक झालीय. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. कंपनी बंद असताना एवढी मोठी आग लागल्याने आगीची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. जपानच्या कोयासना विद्यापीठाकडून फडणवीसांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे कोयासना विद्यापीठातर्फे पदवी मिळवणारे पहिले उपमुख्यमंत्री आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालन सिंह यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा नितीश कुमार यांच्याकडे सुपूर्द केल्याचे वृत्त आहे. २९ डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय किंवा घोषणा होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात बिहार काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली.
देशात कोविड-19 च्या नवीन प्रकार JN.1 चे 69 प्रकरणे आहेत. कर्नाटकात सर्वाधिक 34 आहेत. महाराष्ट्रात 9, गोव्यात 14, केरळमध्ये 6 आणि तामिळनाडूमध्ये 4 आहेत. तेलंगणामध्ये 2 प्रकरणे आहेत.
राजस्थानमध्ये उद्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. सुमारे 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात 12 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री असू शकतात. सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मराठा आरक्षासंदर्भात तातडीची बैठक बोलवणार आहेत. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आत्तापर्यंतच्या घडामोडींचा आणि कामांचा आढावा ते घेणार आहेत.
इंडिया आघाडी आम्हाला सोबत घेणार नाही हे आम्हाला माहिती आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी अमच्यावर आरोप करतात की भाजपची बी टीम आहे. म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत. आम्हालाही इंडिया आघाडीत घ्या – इम्तियाज जलील
कोविडची बाधा झाल्याने पुणे येथील निवासस्थानी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे आज ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 113व्या बैठकीस ऑनलाइन पध्दतीने उपस्थिती लावली.
मुंबई : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतीय नौसेनेच्या पोत ‘इम्फाल’चे लोकार्पण
शिर्डी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साई दरबारी आले होते. यावेळी साई दर्शनानंतर त्यांनी साई संस्थानला विविध सूचना केल्या आहेत.
शिर्डीच्या साई मंदिरात ‘नो मास्क नो दर्शन’ असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईसंस्थान प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेत साई संस्थानने भक्तांना मास्क द्यावेत.
साई दर्शनासाठी मास्क सक्ती बाबत विखे पाटलांचे मोठे वक्तव्य.
राज ठाकरे VIP म्हणून त्यांना राम मंदिर उद्धाटनाचं निमंत्रण दिलं तर टीका करणाऱ्यांना का बोलवायचं असं महाजन म्हणाले यावर संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. हिंदूत्त्वाच्या बाबतीत व्हिआयपी कोण आणि ढोंगी कोण हे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला निमंत्रणाची गरज नाही आम्ही आधीपासूनच अयोध्येत आहोत असं संजय राऊत म्हणाले.
खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटलांवर टीका केली आहे. पाज वर्ष अमोल कोल्हे मतदारसंघात फिरले नाही असा आरोप शिवाजीराव पाटील यांनी केला होता. यावर ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे.
कत्तलीसाठी गाईंची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर वाशिम जवळ गाईंनी भरलेला हा ट्रक पकडण्यात आला.
नाशिकच्या एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंती निमीत्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दत्त जयंती निमीत्त नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.
जळगावात शेतकऱ्यांच्या कांद्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. प्रती किलो 3 रूपये या भावाने कांदा खरेदी केला जात आहे. कडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर कांदा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. तर काही शेतकऱ्यांनी कांद्यांवर रोटावेटर फिरवला आहे.
अमरावती- संसदेत तरुणांच्या घुसखोरी प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या खासदारांच्या निलंबनावरून अमरावतीत शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादीच्या वतीने बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. 146 खासदारांचं निलंबन करून केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट धुळे शहर विधानसभा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. पक्षाचे सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांचं शहरात चांगलं कार्य आहे. कामाच्या जोरावर धुळे शहराची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार,” असं आमदार निलेश लंके म्हणाले. शहरात यापूर्वी देखील राष्ट्रवादीचे दोन वेळेस आमदार होते.
मुंबई ते भुवनेश्वर विमानाला उशीर झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुंबईहून भुवनेश्वरला जाणाऱ्या सकाळी साडेआठच्या विमानातील प्रवासी गेल्या साडेतीन ते चार तासांपासून विमानतळावर अडकले आहेत. फ्लाइटची वेळ सकाळी 8:30 वाजताची होती, परंतु अद्याप फ्लाइटमध्ये सोडण्यात न आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी केलेल्या गोंधळानंतर त्यांना विमानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण विमानाचं उड्डाण अद्याप झालेलं नाही.
शिरुर लोकसभा मतदार संघात विकासकामं होत नसल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता. आजच ३० हजार कोटी रुपयांच्या कामाची निविदा पार पडली, असं सांगत खासदार अमोल कोल्हेंनी कामाची पोचपावती दिली. शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली ,तळेगाव ते शिक्रापूर- आणि वाघोली ते शिक्रापूर या तिन्ही मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे. या तिन्ही मार्गावरील निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आयोध्या नगरी सज्ज… शरयू नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी… गंगा यमुना शरयू या नद्यांना मोठे धार्मिक महत्त्व… देशभरातले भाविक शरयू नदी किनारी दाखल…
केमिकलमिश्रीत पाण्यामुळे चिकुर्डे येथील वारणा नदी पात्रात मृत माशांचा खच जमला आहे. मृत माशांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कारखाण्यावर कडक कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात घटना घडली आहे. 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. दोन चाकी चार चाकी गाड्या फोडण्यात आल्या आहेत.. दहशत माजवण्यासाठी कोयत्याने गाड्या फोडल्याची माहिती समोर येत आहे.
राम मंदिराच्या कार्यक्रमच आमंत्रणं येईल तेव्हा बघू… 23 जानेवारी सुभाष बाबू आणि बाळासाहेबांची जयंती… राजकीय पक्षांना मीटिंग घ्याव्याच लागतात… घरात बसून राजकारण थोडंच करता येईल… कोणाला बरोबर घ्यायचं, कोणाला बाजूला ठेवायचं ही चर्चा मीडियात थोडी होते.
राम मंदिराच्या कार्यक्रमच आमंत्रणं येईल तेव्हाचं तेव्हा बघू, असं छगन भुजबळ म्हणाले.
राजकीय पक्षांना मीटिंग घ्याव्याच लागतात, घरात बसून राजकारण थोडंच करता येतं ?, कोणाला बरोबर घ्यायचं, कोणाला बाजूला ठेवायचं ही चर्चा मीडियात होत नसते, असेही ते म्हणाले.
छगन भुजबळ काहीही बरळतात. भुजबळ आम्हाला काय संस्कार शिकवणार, सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावा, असा सवाल मजोन जरांगे यांनी विचारला.
मुंबईतलं आंदोलन सर्वात मोठं असेल. सर्व कामं आटपून ठेवा, मुंबईत धडक द्यायची आहे. मिळेल त्या वाहनाने मुंबईत या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
अजित पवार मोठे नेते आहे. त्यांनी तेव्हाच माझा कान का धरला नाही, असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला. राजकीय भूमिका बदलल्यानं अजित पवारांनी माझ्यावर टीका केली.
उद्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू होत आहे. शेतकरी आक्रोश मोर्चावर शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
कांदा निर्यातबंदी, पीकविमा यासंदर्भात चर्चा केली, असे ते म्हणाले.
मोदी रामाचं बोट धरून मंदिरात नेत आहेत, असं पोस्टर भाजपाने छापलं. त्यांचं पोस्टर लोकांच्या भावना दुखावणारं आहे, असे संजय राऊत म्हणाले.
नाशिक पोलिस आज सुधाकर बडगुजर यांची पुन्हा चौकशी करणार आहेत. सलीम कुत्तासह आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बडगुजर अडचणीत सापडले आहेत. बडगुजर हे आज आपल्या वकिलांसह चौकशीसाठी हजर राहतील.
इचलकरंजी शहरातील गुजरी पेठेतील फटाक्यांच्या दुकानाला सकाळच्या सुमारास आग लागली. संपत माळकर यांच्या दुकानाला आग लागून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात मिळाले यश. गुजरी पेठेतील भर वस्तीत दुकानाला आग लागल्यामुळे आजूबाजूला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नाशिकमध्ये JN 1 या कोरोनाच्या नव्या विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संशयित महिला रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात संशयित महिला रुग्णाला ठेवण्यात आलं आहे. महिला रुग्णाचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
अजित पवारांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला दाखल झालेत. शरद पवारांच्या मोदी बागेतील कार्यालयात ही भेट होत आहे. आता शरद पवार त्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहावं लागेल.
बालवाडी आणि नर्सरीत शिकणाऱ्या लहान मुलांसाठी नवीन कायदा येणार आहे. शिक्षण विभागाने मसूदा तयार केला आहे. मसुदा राज्य सरकारला सुपूर्द केला. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळणार आहे. लहान मुलांना शाळेत किती वेळ ठेवावं,कोणत शिक्षण द्यावे यासाठी मसूदा तयार केला आहे. राज्य सरकारला सादरही केला आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भाविक दत्तजयंतीनिमित्त अक्कलकोटनगरीत दाखल झालेत. आज दत्तजयंतीनिमित्त स्वामी समर्थांची नगरी असलेल्या अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केलीय. भाविकांच्या गर्दीने अक्कलकोट नगरी दुमदुमून गेलीय. पहाटे विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर आज दिवसभर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.
डेंग्यूच्या लसीवर पुण्यातील ससून रुग्णालयात संशोधन होणार. जवळपास 100 रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. बी जे वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे नॉलेज सेंटरच्या वतीने याच संशोधन करण्यात येणार आहे. सध्या डेंगूवरील लस ही अमेरिका,दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियात उपलब्ध आहे.
मुंबईतील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर वर्षाच्या अखेरीस तरी थंडीचा पूर्णत्वाने अनुभव घेता येईल अशी मुंबईकरांना आशा होती. मात्र मुंबईमध्ये 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. राज्यातही काही भागात या वर्षाच्या अखेरीस आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
लडाखमधील लेहमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे 4 वाजून 33 मिनिटांनी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू 5 किमी खोलीवर होता आणि 34.73 अक्षांश आणि 77.07 रेखांशावर भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच जम्मू-काश्मीरजवळील किश्तवाड जिल्ह्यात 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, किश्तवाडमध्ये मध्यरात्री 1 वाजून 10 मिनिटांनी 5 किमी खोलीवर भूकंप झाला.
गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस 25 ते 5 डिसेंबर पर्यत दहा दिवस पुण्यापर्यंतच धावणार. पुणे विभागातील सांगली ते मिरज दरम्यान दुहेरी मार्गातील नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार. दुहेरी रेल्वेमार्गावर कामाचा परिणाम, नागपूर-कोल्हापूर रेल्वेच्या तीन फेऱ्या रद्द. काही गाड्याच्या फेऱ्या रद्द तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनल करण्यात येत आहे. रेल्वेमार्गाच्या कामाचा परिणाम विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या काही गाड्यावर होणार आहे..
पुणे लोकसभा मतदार संघासाठी सुनील देवधर यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. नुकतीच त्यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पुण्यात येत्या दोन महिन्यांत 3 मोठ्या कार्यक्रमाद्वारे ते आपले शक्ती प्रदर्शन करणार आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा मतदार संघातून पुन्हा हेमंत रसने यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहे.
हेमंत रासने यांचा पराभव झाला. मात्र पराभव झाल्यापासून ते पुन्हा कामाला लागले आहेत. त्यांनी विजयाकडे घोडदौड सुरु केली आहे. येत्या काळात ते निश्चित यश मिळवतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
वाहनधारकांचा बेदरकारपणा वाढला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 30 हजारांहून अधिक अपघात झाले असून त्यात बळी गेलेल्यांचीही संख्या मोठी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातात 2 टक्क्यांनी तर मृतांमध्ये दोन टक्क्यांची घट झाली आहे.
नाशिक बाजार समितीत भाज्यांची आवक कमी झाली आहे. अवकाळी पावसाचा फटका भाज्यांना बसला आहे. यामुळे बाजार समितीत सर्वच भाज्या प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वधारल्या आहेत. इतर सर्वच भाज्यांचे दर वधारलेले असताना बाजार समितीत टोमॅटोचे दर मात्र काहीसे उतरल्याचे बघायला मिळत आहेत.