एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची मुंबईच्या जनतेला कळकळीची विनंती

| Updated on: Jul 04, 2024 | 8:33 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या जनतेला कळकळीची विनंती केली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट प्रेमींची उसळलेली गर्दी पाहून देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला काळजी घेण्याचं तसेच पोलीस, प्रशासनाला सहकार्य करण्याची महत्त्वाची विनंती केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची मुंबईच्या जनतेला कळकळीची विनंती
देवेंद्र फडणवीस
Follow us on

क्रिकेट चाहत्यांकडून टीम इंडियाचं मोठ्या उत्साह आणि जल्लोषात मुंबईत स्वागत करण्यात आलं आहे. मुंबई आणि उपनगरातील लाखो क्रिकेट चाहते मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथील रस्त्यावर जमले आहेत. प्रचंड मोठी गर्दी टीम इंडियाच्या स्वागतासाठी आज दुपारपासून दाखल आहे. ही गर्दी पाहता पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारही सतर्क झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दीचं गांभीर्य ओळखून तातडीने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना फोन करत गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचं आणि नियोजन करण्याच्या सूचना केल्या. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुंबईतील जनतेला अतिशय मोलाचं आवाहन आणि विनंती केली आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“मला या निमित्ताने केवळ आमच्या नागरिकांना एवढीच विनंती करायची आहे की, गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. उत्साह देखील मोठा आहे. पण या उत्साहात सर्वांनी त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. प्रशासन आणि पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त केलेला आहे. त्यालादेखील जनतेने सहकार्य करावं, अशा प्रकारची मी विनंती जनतेला करतो. पण खरोखरंच एक भारतीय म्हणून मलादेखील अतिशय आनंद आहे की, आमच्या टीमने विश्वचषक जिंकलेलं आहे. ती विश्वविजेती टीम आज आपल्या मुंबईत या ठिकाणी आलेली आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांचंदेखील आवाहन

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी टीम इंडियाचं मुंबईत स्वागत असल्याचं म्हटलं आहे. “टीम इंडियाचं मी मनापासून स्वागत करतो. टीम इंडियाचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. मरीन ड्राईव्हच्या परिसरात गर्दी उसळली आहे. सागराच्या बाजूलाच मुंबईकरांचा महासागर उसळला आहे. त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “आपल्या लाडक्या टीम इंडियाचं स्वागत करताना मुंबईकरांकडून ज्या भावना व्यक्त होत आहेत ते आपण पाहत आहोत. संपूर्ण देशवासियांना अभिमान वाटेल असं यश टीम इंडियाने मिळवलं आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. टीम इंडिया आणि खेळाडूंची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ नये यासाठी मी पोलिसांना सूचना केल्या आहेत. व्यवस्थित नियोजन करा आणि सुरक्षितपणे या उत्साहाचा आनंद लोकांना घेऊ द्या”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट प्रेमींचा महासागर

दरम्यान, मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट प्रेमींचा अक्षरश: महासागरात लोटला आहे. लाखो चाहते इथे जमले आहेत. अतिशय ऐतिहासिक असा हा क्षण आहे. लाखो चाहत्यांकडून टीम इंडियाचं स्वागत केलं जात आहे. अनेकांकडून फोटो, व्हिडीओ काढले जात आहेत. टीम इंडियाच्या विजयी यात्रेचे हे अविस्मरणीय क्षण आयुष्यभर लक्षात राहावेत यासाठी तरुणांकडून मोबाईलच्या कॅमेऱ्यात व्हिडीओ कैद करण्यात आले आहेत.