महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 15 ते 20 दिवसांच्या मोठ्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराला झोडपलं आहे. मुंबईत आज संध्याकाळी सहा वाजेपासून धुवांधार पाऊस पडतोय. पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. मुंबई महापालिकेकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पण पाऊस राक्षसासारखा कोसळतोय. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक सध्या तरी सुरु असली तरी तिचा वेग मंदावला आहे. मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सेकंड शिफ्ट करुन घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.
पावसाने थोडा वेळ उघडीप घेतली तर आजची रात्र सुरळीत जाऊ शकतो. पण सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात. संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. हवामान विभागाकडून मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वत: याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. शिक्षण विभाग काही वेळातच याबाबतचा अधिकृत परिपत्रक जारी करणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.
महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाचेच असणार आहेत. पुढचे चार दिवस पाऊस हा महाराष्ट्राच ठाण मांडून असणार आहे. हवामान विभागाकडून याबाबत याआधीच माहिती देण्यात आली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याची माहिती समोर येत होती. मुंबईला या परतीच्या पावसाच्या झळा आज बसताना दिसत आहेत. मुंबईत अतिशय भयंकर पाऊस पडतोय. हवामान विभागाने मुंबईसाठी उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर उद्या दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. मुंबईसह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना देखील उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर ऑरेंज अलर्ट असणार आहे.