शेवटच्या कॅबिनेटमध्ये सरकारचा मोठा निर्णय, त्यानंतर श्रेयवादही सुरु

| Updated on: Oct 14, 2024 | 9:24 PM

विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. या विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आज झालेल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला. या निर्णयानंतर श्रेयवादही सुरु झाला आहे.

शेवटच्या कॅबिनेटमध्ये सरकारचा मोठा निर्णय, त्यानंतर श्रेयवादही सुरु
Follow us on

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी सरकारनं आणखी एक मास्ट्ररस्ट्रोक लगावला आहे. मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील सर्व पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये, सरकारनं मास्ट्ररस्ट्रोक मारला आहे. मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील पाचही टोल नाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली. म्हणजेच आता या टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोल लागणार नाही. वाशी टोलानाका, दहिसर म्हणजेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील टोलनाका., मुलुंड, अर्थात ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील टोलनाका, आनंदनगर म्हणजेच एलबीएस टोलनाका आणि ऐरोली टोलनाक्यावर टोलमुक्ती असणार आहे.

आता हलक्या वाहनांसोबतच शाळेच्या बसेस आणि एसटी बसेसलाही मुंबईच्या पाचही टोलनाक्यावर टोल लागणार नाही. कारला टोल नसेल. सध्या आनंदनगर टोलनाक्यावर कारला 45 रुपये टोल आहे. छोट्या वाहनांमध्ये जीपचाही समावेश आहे. जीपलही टोलमुक्ती आहे. आनंदनगरच्या टोलनाक्यावर जीपलाही 45 रुपयांचा टोल आहे.

लहान वाहनांसोबतच शाळेच्या बसेसकडूनही टोल न घेण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय..सध्या आनंदनगरच्या टोलनाक्यावर 150 रुपयांचा टोल आहे. शाळेच्या बस बरोबरच एसटी बसलाही टोल नसेल. एसटीच्या बसेसला मुंबईच्या पाचही टोलनाक्यावर टोल लागणार नाही, सध्या एसटीला 150 रुपये टोल लागतो.

मुंबईच्या एंट्री पॉईंटवर सरकारनं छोट्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेतल्यानंतर श्रेयवादही सुरु झाला. मनसेनं फटाके फोडत आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. तर भाजपनंही ढोल वाजवत निर्णयाचं स्वागत केलं. इकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोल माफीवरुन मनसेच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आणि फक्त निवडणुकीपुरताच निर्णय नाही हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणीही केली.

राज ठाकरे काय म्हणाले

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरुन आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरु नका.

निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्याआधी शेवटच्या कॅबिनेटमध्ये मुंबई परिसर आणि नवी मुंबईतल्या मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे.