Shiv Sena Symbol : ‘नाव जपा…’, राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या भाषणाचा भावनिक व्हिडीओ शेअर करत पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 17, 2023 | 8:05 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली.

Shiv Sena Symbol : नाव जपा..., राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या भाषणाचा भावनिक व्हिडीओ शेअर करत पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा सर्वात मोठा निर्णय आहे. शिवसेना हे फक्त नाव नाही तर लाखो शिवसैनिकांची भावना आणि श्वास आहे. त्यामुळे शिवसैनिकांचं या सुनावणीकडे लक्ष होतं. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे यांनी ट्विटरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केलाय.यावेळी त्यांनी एक मेसेज देखील लिहिला आहे. बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होतार ते आज पुन्हा एकदा कळलं, असं राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.

एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.

संजय राऊत यांच्याकडून प्रतिक्रिया

या निकालावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे अपेक्षित होतं, ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाफ झाला हा वापर कुठपर्यंत झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असा केला पाहिजेजो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“या आदेशातल्या सर्व स्वायत यंत्रणा यांना गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यातील हे पहिले पाऊल आहे. निवडणूक आयोग आहे. न्यायालय गुलाम असल्यासारखं वागत आहे. या निर्णयाला नक्कीच आव्हान दिले जाईल. चाळीस बाजार बुनगे बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह जर कुणी विकत घेणार असेल तर लोकशाही वरील विश्वास उडून गेला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाकी असतांना निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्रवर अन्याय आहे. याशिवाय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ताब्यात घेण्यासाठीचा हा फास आहे. माझा आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही”, असंही संजय राऊत यांनी म्हंटले आहे