‘…मग बिळाच्या बाहेर पडतात’, अमित ठाकरे यांची पहिल्यांदाच भाऊ आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका

| Updated on: Aug 18, 2023 | 9:51 PM

Amit Thackeray slams Aaditya Thackeray | मनसे नेते अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपला भाऊ आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या टीकेवर आता आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

...मग बिळाच्या बाहेर पडतात, अमित ठाकरे यांची पहिल्यांदाच भाऊ आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका
Follow us on

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला अचानक स्थगिती देण्यात आल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज सकाळीच मुबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याच्या निर्णयाविरोधात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी आज रात्री आठ वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ही निवडणूक ठरल्याप्रमाणे पार पडली असती तर या निवडणुकीत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे राजकारणात समोरासमोर आलेले बघायला मिळाले असते. अर्थात ते आगामी काळात बघायला मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरे कुटुंबातील या दोन्ही बंधूंची समोरासमोर राजकीय लढाईची ही पहिलीच वेळ होती. पण त्याआधीच निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांनी या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांच्यावर नाव घेत थेट निशाणा साधलाय. त्यामुळे आता या निवडणुकीवरुन आणखी वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

‘…मग बिळाच्या बाहेर पडतात’

अमित ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी उचलून धरलाय, त्यावर आपली भूमिका काय? असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर अमित ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं निवडणुकीच्या वेळेला हे लपून बसतात. अशी स्थगिती वगैरे मिळाल्यावर बिळाच्या बाहेर पडतात. निवडणुकीत उतराना. हे तुम्ही आता कुणाचं नाव घेतलं? आदित्यचं ना?”, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली.

“आपण सगळे पक्ष मैदानात उतरु आणि लोकांना ठरवू द्या. युवासेनेच्या गेल्यावेळी निवडून आलेल्या 10 पैकी 5 सदस्यांना तरी विचारा की, गेल्या पाच वर्षात तुम्ही पाच कामे तरी केली आहेत का? ती 5 कामे दाखवा. तुम्ही कुसल्या जोरावर बोलत आहात? स्थगिती मिळाल्यावर का बोलत आहात?”, असे सवाल त्यांनी केला.

“आम्ही कोर्टात लढण्यापेक्षा रस्त्यावर लढण्यावर जास्त विश्वास ठेवतो. मला माहिती आहे, एका पक्षाला सतत कोर्टात जायला आवडतं, तो पक्ष कोर्टात जाणारच. कोर्टातून निर्णय कधी येईल ते आम्हाला माहिती नाही. पण महाराष्ट्राच्या जनतेचा निर्णय पुढच्यावर्षी राज ठाकरे यांच्या बाजूने लागेल हे मी तुम्हाला खात्री देवून सांगेन”, असं अमित ठाकरे म्हणाले.

‘तुम्ही चुकीचे आहात म्हणून तुमच्या विरोधात वातावरण’

“कोण कुणाच्या बाजूने आणि कोण कुणाच्या विरोधात आहे हे तुम्हाला निवडणुका घेऊन कळणार. तुम्हाला भीती वाटत असेल तर निवडणुका पुढे ढकलणे हा पर्याय नाहीय. तुम्ही मैदानात उतरा. तुम्ही चुकीचे आहात म्हणून तुमच्या विरोधात वातावरण आहे. ही लोकशाही आहे. लोकांना बोलू द्या”, असं अमित ठाकरे म्हणाले.

“मला परिपत्रकावर स्पष्टीकरण हवं होतं. सिनेट निवडणुकीवर अचानक स्थगिती का आणली? यावरच मला स्पष्टीकरण हवं आहे. पण तेच स्पष्टीकरण ते देत नाहीयत. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न यावर अवलंबून आहेत. मतदार नोंदणी बोगस झाली तर ठिक आहे, आपण मान्य करु, तुम्हाला बोगस नोंदणी काढायाला किती दिवस हवे आहेत? मैदानातून पळणं हा पर्याय नाही”, असं अमित ठाकरे म्हणाले.

“तुम्ही नोंदणी ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा. आम्हाला काहीच फरक पडत नाही. आमचा पक्ष ज्या पद्धतीने उतरलाय त्याचा मला अभिमान आहे. त्या भीतीने हे सगळं रद्द झालंय. कारण आम्ही अर्ज भरताना त्यांना माहिती होतं की काय होणार आहे. मी मागणी करुन काय करणार? निवडणुका पुढे गेल्या आहेत हे आपल्याला स्वीकारावं लागेल. पण या निवडणुका कधी घेणार ते सांगा. आता पत्रक काढलं आहे. त्यामुळे तुम्ही दोन दिवसात निवडणूक घेऊ असं सांगू शकत नाही”, असं अमित ठाकरे म्हणाले.