Sanjay Raut : ते इतके व्यस्त की 10-10 दिवस वेळ देत नाहीत, संजय राऊत यांचा कुणावर संताप, महाविकास आघाडीत चाललंय काय?

| Updated on: Sep 19, 2024 | 11:18 AM

Sanjay Raut Mahavikas Aaghadi : विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसा महाविकास आघाडी आणि महायुतीत रस्सीखेच आणि तणाव दिसून येत आहे. आता संजय राऊत भडकल्याने महाविकास आघाडीत पण ताणतणाव असल्याचे समोर आले आहे. राऊतांनी त्यांच्या भावना अशा जाहीर केल्या.

Sanjay Raut : ते इतके व्यस्त की 10-10 दिवस वेळ देत नाहीत, संजय राऊत यांचा कुणावर संताप, महाविकास आघाडीत चाललंय काय?
संजय राऊत यांचा संताप
Follow us on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सीट शेअरिंगवरुन घमासान आहे. नेते एकमेकांविरोधात जाहीर दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप करत आहेत. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल वाटत असलं तरी जागा वाटपावरून खदखद असल्याचे समोर येत आहे. राज्यसभा सदस्य आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या मनातील भावना अशा जगजाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील ताणतणाव समोर आला आहे.

काँग्रेसवर हल्लाबोल

संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर थेट हल्लाबोल केला आहे. काँग्रेस पक्ष आजकाल अधिक व्यस्त असल्याचा चिमटा त्यांनी काढला. काँग्रेस नेते 10-10 दिवस वेळ देत नाहीत. पण तारीख पे तारीख देतात. ते लोक कितीही व्यस्त असले तरी आम्ही त्यांना बोलावलं आहे. जागा वाटपाचा प्रश्न सोडवला पाहिजे. आम्ही पुढील तीन दिवस या मुद्दावर बसून चर्चा करणार असल्याचे राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

जागा वाटपावर मुंबईत बैठक

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस या तीनही महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मुंबईत बैठक होणार असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. मुंबईमधील जागा वाटपावरील चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. पण राज्यातील काही भागातील जागा वाटपांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे राऊतांनी सांगितले.

उद्धव ठाकरे गटाची मुंबईतील 36 जागांपैकी 20-22 जागांवर दावेदारी समोर येत आहे. मुंबईत काँग्रेस आणि शिवसेना मोठा दावा करत आहे. या दोन्ही पक्षांचा मुंबईत दबदबा आहे. काँग्रेस पण मुंबईत जास्त जागा मागत असल्याचे समोर येत आहे. शरद पवार यांचा पक्ष पण मुंबईवर लक्ष ठेवून आहे. सध्या काँग्रेस अनेक जागांवर आग्रही असल्याने जागा वाटपांचा पेच कायम आहे.

शिवसेनेचा किती जागांवर दावा?

राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यात उद्धव ठाकरे गट 115 ते 125 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे समजते. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अविभाजित शिवसेनेने भाजपासोबत 124 जागांवर निवडणूक लढवली होती. तर भाजप 163 जागांवर विधानसभा लढवली. राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.