मुसळधार पावसाने हाहा:कार, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा, अडीच तासांपासून ट्रेन नाही?

| Updated on: Sep 25, 2024 | 10:28 PM

मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाणे शहरांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यात रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक कोलमडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली असून त्यांचे हाल होत आहेत.

मुसळधार पावसाने हाहा:कार, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा, अडीच तासांपासून ट्रेन नाही?
मुसळधार पावसाने हाहा:कार, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा
Follow us on

अखेर ज्याची भीती होती तोच अनुभव मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना आज येतोय. कारण हवामान विभागाकडून गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. अखेर मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे जिल्ह्यांना अक्षरश: झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसासह वादळी वारे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे पहिला धक्का हा मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनला बसला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला बघायला मिळतोय. कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या भायखळा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वे मार्गावर अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर मुसळधार पाऊस पडतोय. तसेच लोकल ट्रेन खोळंबल्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी ठाणे रेल्वे स्थानकावर आहे. तसेच यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली नसली तरी अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर गेल्या दोन ते अडीत तासांपासून प्रवाशी खोळंबले आहेत. “आम्ही ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आपल्याला आलेला अनुभव शेअर केला. गेल्या दोन ते अडीच तासांपासून रेल्वे सेवा ठप्प आहे. कुर्ला, सायन परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे”, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.

आम्ही इतर प्रवाशांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “दोन तासांपासून उभी आहे. ट्रेन येते, ट्रेन जाते, काही समजत नाहीय. आता ट्रेनमध्ये चढलो तर चालत्या ट्रेनमधून उतरुन आलो आहोत. काहीच अनाउन्सनमेंट होत नाहीय. बोर्डवरही कोणतीच माहिती दिसत नाही. आता मी राहते विक्रोळीला, तर घरी कसं जावं हेच समजत नाही”, अशी प्रतिक्रिया ठाणे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असलेल्या एका तरुणीने दिली.