मुंबईत आलेल्या परतीच्या पावसाने शहरात अक्षरश: थैमान घातलं आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड आणि राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्याच्या घडीला मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत पावसामुळे जनजवीन पूर्णपणे विस्कळीत होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन ठप्प झाली आहे. तर जोगेश्वरीतून एक हृदय हेलावणारी बातमी समोर येत आहे. जोगेश्वरीत मॅनहोलमध्ये एक महिला पडल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरीच्या सिप्झजवळ ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांकडून महिलेचा शोध घेतला जातोय.
मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यामुळे कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याण तालुक्यातील कांबा परिसरातील ही घटना घडली आहे. दगड खदाणीत काम करताना दोन कामागराचा वीज पडून मृत्यू झाला आहे. राजन यादव, बंदणा मुंडा अशी कामगारांची नावे आहेत. टिटवाळा पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू सुरु आहे.
मध्ये रेल्वेची वाहतूक अजून देखील विस्कळीत आहे. सायन, कुर्ला, घाटकोपर परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या दरम्यान बराच वेळ लोकल ट्रेन थांबल्यामुळे अनेक महिला रेल्वेच्या डब्यातून उतरून पायी चालत गेल्या. यावेळी इतरांनीदेखील तोच पर्याय अवलंबला. कुर्ल्याला पोहचण्यासाठी अनेक प्रवासी रुळावरून चालत स्थानकाकडे जात आहेत.
मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी भरलं आहे. पवई-जेवीएलआर रोडवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईतील पावसाचा मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून कंट्रोल रूम मधून आढावा घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कंट्रोल रूममधून आयुक्तांकडून ठिकठिकाणी पाऊस सुरू असल्याचा आढावा घेतला जात आहे.
मुंबईत आज (२५ सप्टेंबर २०२४) सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आलेले केंद्र पुढीलप्रमाणे. (नोंद मिलिमीटरमध्ये)