आषाढीसाठी पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची बस दरीत पडली, पाच भाविकांचा मृत्यू

| Updated on: Jul 16, 2024 | 7:05 AM

mumbai pune expressway bus accident: पंढरपूरकडे जाणारा ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते. पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

आषाढीसाठी पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची बस दरीत पडली, पाच भाविकांचा मृत्यू
accident bus
Follow us on

मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पंढरपूरकडे जाणारा ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते. पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली.

असा झाला अपघात

अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघात झाला. एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मृतांची संख्या वाढली

भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका जणाचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

१७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यासाठी विठ्ठरुयाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात होते. परंतु काळाने पाच प्रवाशांना दर्शन घेऊ दिले नाही. आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला जात असतात. ज्यांना दिंडीने जाणे शक्य होत नाही, ते भाविक बस आणि रेल्वेने पंढरपूर गाठतात. लाखोंची गर्दी आषाढीला पंढरपूरला होत असते.

दुसऱ्या अपघातात तरुणाचा मृत्यू

नाशिक मुंबई महामार्गावर वैतरणा फाट्याजवळ भरधाव कंटेनरची मोटरसायकलने धडक दिली. या अपघातात कंटेनर मोटरसायकलस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. योगेश मदन परदेशी (वय ३०, राहणार खालची पेठ इगतपुरी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे. जागीच वळण आणि उतार आहे. त्या ठिकाणी दिशादर्शक फलकही नाही व मोठ्या प्रमाणत अंधार आहे. कंटेनर चालकाला घोटी पोलिसांनी घेतले आहे.