मुंबईकरांनो सावधान! थोड्याच वेळात समुद्रात उसळणार उंचच उंच लाटा

| Updated on: Jul 08, 2024 | 1:46 PM

मुंबई शहरासह उपनगरात काल रात्रीपासून सुरु असलेली पावसाची संततधार अद्यापही कायम आहे. मुंबईत सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे.

मुंबईकरांनो सावधान! थोड्याच वेळात समुद्रात उसळणार उंचच उंच लाटा
Follow us on

Mumbai Rain High Tide : मुंबई शहरासह उपनगरात काल रात्रीपासून सुरु असलेली पावसाची संततधार अद्यापही कायम आहे. मुंबईत सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज दिवसभर मुंबईत अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबईतील समुद्रात आज दुपारी १.५७ मिनिटांनी उंचच उंच लाटा उसळणार आहेत. मुंबईतील समुद्रात साधारण ४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचे दिसत आहे. सध्या चर्चेगेट, दादर, लालबाग, सीएसटी, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

शाळांना सुट्टी

समुद्रात मोठी भरती असल्याने सर्व मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्याहून मुंबईला येणाऱ्या 3 एक्सप्रेस रद्द

मुंबई उपनगरात मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच सीएसएमटीवरुन पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबई उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.

त्यासोबतच मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या विविध ठिकाणी अडकून पडल्याचे दिसत आहेत. यातील काही एक्सप्रेस गाड्या या कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ या स्थानकादरम्यान अडकून पडल्या आहेत. जोपर्यंत फास्ट ट्रॅक सुरु होत नाही, तोपर्यंत या गाड्या सुरु होण्याची शक्यता दिसत नाही.

आमदारही अडकले

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी जाणाऱ्या काही आमदारांनाही मुंबईतील मुसळधार पवासाचा फटका बसला आहे. मुंबईतील मुसळधार पावासामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे हावडा एक्सप्रेस ही बऱ्याच काळापासून कुर्ला परिसरात अडकली आहे. या एक्सप्रेसने कॅबिनेट मंत्री अनिल पाटील, संजय गायकवाड, अमोल मिटकरी, जोगेंद्र कवाडे यांसह अनेक आमदार प्रवास करत होते. त्यामुळे काही आमदारांनी रेल्वे रुळावरुन चालत प्रवास केला.