उद्धव ठाकरे मंचावर असताना प्रकाश आंबेडकर यांचं धर्म, मनुस्मृती आणि हिटलशाहीवर रोखठोक मनोगत

| Updated on: Nov 21, 2022 | 12:59 AM

"प्रबोधनकारांनी मनुस्मृतीला दोष दिलं. हे असं विष आहे की माणसाला कळत नाही की आपण विष पितोय. ते प्यायला नंतर बळी माणसाचा जातो, पण त्याचबरोबर देशाचाही जातो', असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

उद्धव ठाकरे मंचावर असताना प्रकाश आंबेडकर यांचं धर्म, मनुस्मृती आणि हिटलशाहीवर रोखठोक मनोगत
Follow us on

मुंबई : ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी भाषण करताना प्रकाश आंबेडकर यांनी प्रबोधनकारांच्या लिखाणावर मनोगत मांडलं. यावेळी त्यांनी मनुस्मृती आणि हिटलशाहीवर रोखठोक भूमिका मांडली.

“प्रबोधनकारांनी मनुस्मृतीला दोष दिलं. हे असं विष आहे की माणसाला कळत नाही की आपण विष पितोय. ते प्यायला नंतर बळी माणसाचा जातो, पण त्याचबरोबर देशाचाही जातो. जेवढ्या लवकर आपण या विष पाषाणातून बाहेर पडू तेवढं अधिकाअधिक लवकर आपण या देशाला उभं करु शकतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“हजारो वर्षांचा इतिहास पाहिला तर आपण नेहमी वर्णन करतो की हा गुलामीचा इतिहास. मी असं मानतो की, गुलामी एकाच वर्गाची आहे. उरलेले त्यामध्ये भरडले गेले. राजेशाही संकल्पना क्षत्रियांची होती. लढण्याची संकल्पना क्षत्रियांची होती. म्हणून एकदा क्षत्रिय हारला की उरलेले सगळे हारले. कारण शस्त्र घेण्याचा अधिकारच इतरांना नव्हता. याला छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ अपवाद आहे. म्हणून आम्ही मनुच्या कायद्यात अडकून पडणार आहोत की नव्याने काहीतरी उभे करणार आहोत?”, अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. “आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. प्रकाशजी आपल्याला हे काम करावंच लागेल. नुसतं लोकांना जागं करुन उपयोग नाही. आपण जर काही करणार नसू तर लोकं झोपली तर झोपू द्या, त्यांची निद्रानाश तरी नको करुयात. जागं करुन सोडणार असू मग ते न केलेलं बरं नाही. पण आपण ते करणार नसू तर आपल्या दोघांना आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

प्रकाश आंबेडर आणखी काय-काय म्हणाले?

“आपण आता सर्वांना हिंदू हा शब्द वापरायला लागलो. पण यामध्ये दोन विचारसरणी आहे. एक वैदीक परंपरा आणि दुसरी संतांची परंपरा आहे. यांचं वर्णवन करायचं झालं तर एकीकडे विद्वावेचं मुंडन आणि दुसरीकडे तिचा पुनर्विवाह आहे. संतांची ही दोन वेगवेगळी विचारसरणी आहे. नेमकी आम्हाला कुठली पाहिजे? हा आता काळाचा प्रश्न आहे, असं मी मानतो.”

“प्रबोधनकारांच्या लिखाणाचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला धक्का बसेल. त्यांनी सगळ्या वैदिक परंपरेवर आसूड मारला आहे. भवितव्याचा विचार करायचा असेल तर धर्म सार्वजनिक कसा होईल, याची मांडणी केलीय.”

“आपण महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांना मानत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर यांना आता मानायला लागलो. पण या तीनही माणसांनी धर्म नाकारला नाही. फुलेंनी सत्य शोधक समाजाचा पुरस्कार केला. महात्मा गांधींनी वर्णाश्रमाचा केला, तर बाबासाहेबांनी बुद्धांचा पुरस्कार केला. धर्म हा आवश्यक आहे, असं त्यांनी मानलं. पण धर्माच्याअधीन राहून त्यांनी काही करता येईल का म्हटलं का? तर नाही. त्यांचं धर्माशी भांडण नव्हतं. तर सामाजिक व्यवस्थेशी भांडण होतं. त्यांनी सुधारणा काय झाल्या पाहिजेत याची मांडणी केली. त्यांनी सणांवर टीका केली नाही.”

“आपण राष्ट्र म्हणू उभे का राहिलो नाही, असा विचार केला तर आपण समता आणि बंधूभावाचा बळी दिलाय. जात ही नावाची व्यवस्था सुद्धा एक देश आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पूर्ण केंद्र सरकारने काप याचा शिक्षण द्यावं अशी परिस्थिती आहे.”

“उत्तर भारतात काप म्हटलं म्हणजे आपल्या इथे जातीय पंचायत आपण म्हणतो. काप या संस्थेचा पुरस्कार करायचं म्हणतो त्यावेळेस आपण नेमकं कुणाला पुढे करतो? आपण ज्यावेळेस प्रबोधनकारांना वाचायला सुरुवात करतो तर त्यांनी सर्व बंदीस्त व्यवस्थांवर ओढलेला असूड नाकारायला सांगितलाय. समता, बंधूभाव कसा निर्माण होईल, एकमेकांविषयी आपुलकी कशी वाढेल, यासाठी या मंडळींनी लिखाण केलं. माणसं भाषा आणि संस्कृतीवर एकत्र येतात. भाषा आणि संस्कृती यामधलीच आपुलकी नसेल तर माणसं एकत्र येणार नाही.”

“दडपशाहीचं वातावरण वाढलेलं आहे. आपण मुसलमानांना म्हणतो की त्यांच्यात लोकशाही नाही. पण वैदिक धर्मात कुठे लोकशाही आहे? तिथेही हुकूमशाही आहे. ही व्यवस्था आहे, ती तुम्ही मानलीच पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही, चिकित्सा करता येणार नाही. म्हणून आता नव्याने जे येत चाललं आहे, हुकूमशाही आणि हिटलरशाही ही त्या त्या संघटनेतील विचारधारा आहे. त्यातून ही विचारसरणी आपल्यापुढे आलीय.”