अरबी समुद्रात शिवस्मारकाचं काम कुठपर्यंत झालं? संभाजीराजे यांची पाहणीनंतर पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 06, 2024 | 5:25 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज अरबी समुद्रात जात शिवस्मारकाचं काम कुठपर्यंत झालंय? याची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यानंतर संभाजीराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अरबी समुद्रात शिवस्मारकाचं काम कुठपर्यंत झालं? संभाजीराजे यांची पाहणीनंतर पहिली प्रतिक्रिया
संभाजीराजे छत्रपती
Follow us on

छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने 2016 मध्येच याबाबत निर्णय घेतला आहे. पण संबंधित निर्णय घेऊन सात वर्ष झाली तरी स्मारकाच्या कामकाजाला सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. पण सात वर्षे झाली तरी समुद्रात शिवस्मारक उभारलं न गेल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले. संभाजीराजे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह आज अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या कामजाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांना शिवस्मारकाचं कामकाज होताना कुठेच दिसलं नाही. संभाजीराजे यांनी दुर्बीणमधून ते पाहिलं. शिवस्मार समुद्रात ज्या खडकावर बनणार आहे तिथे जाण्यास प्रशासनाची परवानगी नसल्याने त्यांनी दुर्बीणमधून संबंधित जागेची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामासाठीचं जलपूजन झालं होतं. मी दुर्बीणमधून स्मारक पाहत होतो. पण ते दिसत नव्हते. बोट वाल्यानं विचारले, जाऊ शकतो का? त्यांनी सांगितलं की, परवानगी नाही. छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईमध्ये व्हावं ही इच्छा व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर अनेक पुढारी नेत्यांनी इथे स्मारक व्हावं अशी, इच्छा व्यक्त केली. ते कौतुकास्पद आहे. पण गडकोट किल्ल्यांवर कोणी बोलत नव्हते”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

‘महाराजांचं नाव वापरून मत मागायचे हे…’

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाके यांनी राजकीय आदर्श घ्यावा. पण निवडणुकीला फक्त शिवाजी महाराजांचं नाव वापरून मत मागायचे हे मी होऊ देणार नाही. मला समुद्रात स्मारक कुठेही पाहायला मिळत नव्हते. जलपूजन करताना मनात शंका आलेली. पण चांगलं काम होत असताना काही बोललो नाही. डीसीपीमधून स्मारक आणि गडकोट किल्ल्यांसाठी किती पैसे खर्च केले?”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राजकारणात चांगल्यासाठी वापरा. खेळ करू नका. 8 वर्षे झाले. देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा सर्व परवानग्या हव्या. त्या नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावले कसे? दरवर्षी जसे महाराजांचे नाव राजकारणात वापरले जाते या निवडणूकमध्ये तसे होऊ देणार नाही”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

‘हे पूर्णपणे जनतेला फसवण्याचे काम’

“व्यक्तिगत कोणाच्या विरोधात बोलत नाही. सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून सुरुवात केली तर आताच्या एकनाथ शिंदेपर्यंत, देवेंद्र फडणवीस यांना माझी सूचना आहे, जे काही चुकले ते चुकले. गड-किल्ल्यांना पैसे द्या. मुंबई मनपा निवडणूक असताना ते लक्षात ठेवून या स्मारकाची घोषणा केली. आता पर्यावरणप्रेमींनी विरोध केला, आता तक्रार करून चालत नाही. तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानांना बोलावून जलपूजन करतात, हे पूर्णपणे जनतेला फसवण्याचे काम केले”, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

“राजकोट किल्ल्यावर जे झाले त्याआधी मी स्वतः 8 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलं होतं. पुतळा उभा राहायला अडचण नाही. प्रोसेस, ऑडिट व्यवस्थित केले पाहिजे”, असं संभाजीराजे म्हणाले. तसेच “गडकोट किल्ल्यांसाठी पैसे जाहीर करा. 10 ते 12 किल्ले समुद्रात आहेत. 2 तास फिरलो. पण जलपूजन झालेली जागा कुठेही दिसली नाही. कोणीतरी विरोध केला म्हणून काम बंद केले”, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली.