Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असणारा समृद्धी महामार्ग अजून पूर्ण झाला नाही. या महामार्गाचा शेवटचा टप्पा अजून राहिला आहे. परंतु महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना झटका बसणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी ) येत्या 1 एप्रिलपासून महामार्गावरील टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ तब्बल 19 टक्के करण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी ही वाढ केल्यामुळे आता पुढील महिन्यांपासून वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आता येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सुरु होणार आहे. मात्र संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच एमएसआरडीसीने टोलमध्ये मोठी वाढ केली आहे. नवी टोलवाढ येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी एक्सप्रेस असे नाव दिले. या मार्गाचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 ला सुरु झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी असा 520 किमी मार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भरवीर असा 105 किमीचा मार्गाचे उद्घघाटन केले होते. 23 मे 2023 पासून हा दुसरा टप्पा सुरु झाला होता. त्यानंतर तिसरा टप्पा 4 मार्च 2024 रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यान सुरु झाला. आता शेवटचा 76 किमीचा टप्पा महिन्याभरात सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.