मागच्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागात सतत पाऊस कोसळतोय. मुंबईत सूर्य दर्शन कमी झालं असून ढगाळ वातावरण जास्त असतं. रात्रीच्यावेळी सुरु होणाऱ्या पावसाचा जोर सकाळच्यावेळी वाढतो. त्यामुळे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होतात. आजही मुंबईकरांची पहाट तशीच झाली. सकाळच्यावेळी पावसाचा जोर जास्त होता. त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर झाला. कल्याण वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही 5 ते 10 मिनिटे उशीराने सुरू आहे. तसेच हार्बर लाईनवरील लोकलही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले.
“आजचे जे सॅटलाइट फोटो आहेत, त्यानुसार पुढच्या 3-4 तासात मुंबई, ठाण्यासह कोकण पट्ट्यात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मागच्या 24 तासात कोकणात जोरदार पाऊस कोसळलाय”
20 Jul, 9.30 am satellite obs indicate possibility of mod to intense spells of rainfall ovr konkan region including Mumbai Thane in nxt 3,4hrs.
📌Past 24 hrs Konkan recd heavy to very heavy with isol extremely heavy rains & so need to kp watch on imd updates pl@SDMAMaharashtra pic.twitter.com/IohYCrRHCz— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 20, 2024
कुठल्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट?
मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलय. पण त्यामुळे वाहतूक कोलमडलेली नाही. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईच एपीएमसी मार्केटमध्ये देखील पाणी साचलं आहे. मुंबई शहरासह ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या उपनगरी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसर, गोरेगाव या भागांतही जोरदार पाऊस सुरू आहे.